

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. भारतीय सुरक्षा दलांनी शुक्रवारी (दि.२६) रात्री मोठी कारवाई करत लष्कर-ए-तैयबा (एलईटी) च्या सात दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त केली.
दक्षिण काश्मीरमधील शोपियान, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. शोपियानमधील छोटीपोरा गावात लष्कर कमांडर शाहिद अहमद कुट्टे यांचे घर जमिनदोस्त करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुट्टे गेल्या ३-४ वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता आणि अनेक हल्ल्यांचा तो समन्वयक होता. त्याचवेळी, कुलगामच्या मतलाम भागात सक्रिय दहशतवादी जाहिद अहमदचे घरही पाडण्यात आले.
पुलवामा येथील मुर्रन भागात दहशतवादी अहसान उल हकचे घर उडवून देण्यात आले. अहसानने २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते आणि अलीकडेच तो खोऱ्यात पुन्हा दिसला होता. याशिवाय, जून २०२३ पासून सक्रिय असलेला लष्करचा दहशतवादी अहसान अहमद शेख याचे दुमजली घरही पाडण्यात आले. हरिस अहमद यांचे घरही उडवून देण्यात आले आहे. तो २०२३ पासून दहशतवादात सहभागी आहे. त्याचे पुलवामामधील काचीपोरा येथील घर उडवून देण्यात आले.
यापूर्वी गुरुवारी (दि.२५) रात्री पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या आदिल हुसेन आणि आसिफ शेख यांची घरेही स्फोटांनी उद्ध्वस्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरात स्फोटकेही ठेवण्यात आली होती. अनंतनाग पोलिसांनी गुरुवारी तीन दहशतवाद्यांचे रेखाचित्र जारी केले होते. तिन्ही दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
पहलगामच्या "मिनी स्वित्झर्लंड"मध्ये अचानक गोळीबाराचा आवाज आला. पर्यटक जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावत होते, पण मोकळ्या मैदानात लपण्यासाठी जागा नव्हती. या हल्ल्यात एका नेपाळी नागरिकासह २६ जणांचा मृत्यू झाला. यानंतर कारवाई करत भारत सरकारने सिंधू पाणी करार रद्द केला आहे आणि पाकिस्तानवर दहशतवादाला पाठिंबा देण्याचा आरोप करत पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना हद्दपार केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत की, "प्रत्येक दहशतवादी आणि त्याच्या साथीदारांना शोधून शिक्षा केली जाईल." पहलगाम दहशतवादी घटनेनंतर, लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संपूर्ण परिसरात मोठी शोध मोहीम सुरू केली आहे आणि दहशतवाद्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.