

Rajya Sabha Elections 2026: नवीन वर्षात संसदेतलं सत्तासमीकर बदलणार आहे. 2026 हे वर्ष राज्यसभेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या वर्षात राज्यसभेच्या तब्बल 75 जागा रिक्त होणार असून एप्रिल, जून आणि नोव्हेंबर या टप्प्यांत त्या जागांसाठी निवडणुका होतील. याच काळात पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने देशाचं राजकीय वातावरण तापणार आहे.
या निवडणुकांनंतर राज्यसभेत एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यातील ताकदीचं गणित बदलू शकतं. बिहारमधून पाच तर उत्तर प्रदेशातून दहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. याशिवाय महाराष्ट्र, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि ईशान्येकडील अनेक राज्यांमधील जागाही रिक्त होतील.
2026 मधील राज्यसभा निवडणुका केवळ आकड्यांचा खेळ नाहीत, तर संसदेत पुढील कायदेविषयक अजेंड्याची दिशा यावरुन ठरणार आहेत. या वर्षात ज्यांचा कार्यकाळ संपतोय, त्यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पंतप्रधान एच. डी. देवगौड़ा, दिग्विजय सिंह, शरद पवार यांच्यासह केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. यातील किती जण पुन्हा सभागृहात परतणार आणि किती नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट नाही.
एप्रिल ते जून या काळात बिहारमधील पाचही राज्यसभा जागा रिक्त होतील. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत एनडीएला मिळालेल्या यशामुळे बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू प्रत्येकी दोन जागांवर दावा सांगू शकतात, अशी शक्यता वर्तवली जाते. काही जुन्या नेत्यांचे पुनरागमनही यामुळे शक्य आहे. महाराष्ट्रात एप्रिलमध्ये सात राज्यसभा जागांसाठी निवडणूक होऊ शकते.
सध्या राज्यसभेत एनडीएचे 129 खासदार आहेत, तर विरोधी पक्षांकडे केवळ 78 जागा आहेत. 2026 मधील निवडणुकांमध्ये एनडीएचं वर्चस्व आणखी वाढेल की कमी होईल, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल, पक्षांच्या आघाडीची गणितं आणि उमेदवारांची निवड, या सगळ्यांचा मिळून राज्यसभेच्या भविष्यातील राजकारणावर निर्णायक प्रभाव पडणार आहे.