

नवी दिल्ली : केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील राहुल गांधी यांच्या हल्ल्यावर प्रत्युत्तर देताना, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी बुधवारी आरोप केला की गांधी कुटुंब "पूर्णपणे तडजोड केलेले राजकीय कुटुंब आहे" आणि काँग्रेस "एक तडजोड केलेला राजकीय पक्ष आहे".
दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना गोयल यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी, इंदिरा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या काही निर्णयांवर टीका केली. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारावर "पंतप्रधानांनी तडजोड केली आहे" असे आरोप करून सरकारवर हल्ला करत आहेत. यावर पलटवार करताना गोयल यांनी काँग्रेसवर भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आणि "राहुल गांधी म्हणजे तडजोड" आहेत, असे ते म्हणाले.
एआय शिखर परिषदेदरम्यान भारतीय युवा काँग्रेसच्या निदर्शनावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस सुरू असताना, गोयल यांनी आरोप केला की राहुल गांधी नकारात्मक राजकारणाचे पोस्टर बॉय बनले आहेत. काँग्रेस पक्षाचा इतिहास पहा किंवा वर्तमान, त्यांनी देश आणि देशाचे उज्ज्वल भविष्य, नागरिकांचे उज्ज्वल भविष्य यांच्याशी पूर्णपणे तडजोड केली आहे, असे केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले.
राहुल गांधी हे परकीय शक्ती, भारतविरोधी शक्ती, भारतविरोधी संघटना आणि भारतविरोधी सरकारांचे बाहुले आहेत, असा आरोप त्यांनी केला. अशी व्यक्ती काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहे आणि देशाशी खेळत आहे. ते देशवासीयांचे हित पूर्णपणे पणाला लावत आहेत आणि कदाचित त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता, नवीन भारत, उदयोन्मुख अर्थव्यवस्था आणि उदयोन्मुख जगात भारताचे वर्चस्व सहन होत नाही, असा आरोप देखील त्यांनी केला. म्हणूनच, ते वारंवार खोट्यावर खोटे बोलून राष्ट्रीय हितांशी तडजोड करतात, असा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री गोयल यांनी आरोप केला की, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातही राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी घटनाबाह्य अधिकारांचा वापर केला. कधीकधी ते पत्रकारांसमोर मंत्रिमंडळाचे निर्णय फाडून टाकायचे. पंतप्रधानांचा अनादर करणे, राष्ट्रीय सल्लागार परिषदेद्वारे सरकार चालवणे आणि देशावर डाव्या विचारसरणीचा विचार लादण्याचे काम त्यांनी केले. त्यावेळी सोनिया गांधी आणि राहुल गांधी समांतर मंत्रिमंडळ चालवायचे आणि देशाशी तडजोड करायचे. फक्त सोनिया आणि राहुल गांधींनीच देशाशी तडजोड केली नाही. तर राजीव गांधींनीही देशाशी तडजोड करण्यास कधीही मागे हटले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
गोयल म्हणाले की, १९७१ च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धात भारताने विजय मिळवला, परंतु युद्धकैद्यांना सोडताना भारताने पाकव्याप्त काश्मीर परत न घेतल्याने मिळालेले फायदे हिरावून घेण्यात आले. तत्कालीन परराष्ट्रमंत्र्यांनी स्वीडिश अधिकाऱ्यांना सांगून बोफोर्स घोटाळ्याची चौकशी थांबवण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की, त्यांचे मित्र ओटाव्हियो कॅटाराचीला वाचवण्यासाठी, प्रामाणिक चौकशी कशी रोखली गेली. बोफोर्समध्ये काँग्रेस आणि राजीव गांधी यांनी काय भूमिका बजावली हे माहित नाही का, असा आरोप गोयल यांनी केला.
गांधी कुटुंबाने जगासमोर देशाला कलंकित केले आणि तडजोड केली. इंदिरा गांधी देशाच्या हितांशी तडजोड करत होत्या. राजदूत मोयनिहान यांनीही कसे पुष्टी केली की सीआयएने काँग्रेस पक्षाला निवडणुकांसाठी वारंवार निधी पुरवला आणि काँग्रेस पक्षाने सीआयएद्वारे आपले राजकारण चालवले, असे आरोप त्यांनी केले.