

PM Kisan: येणाऱ्या काही दिवसात लाखो शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. जर तुमच्याकडे शेत जमीन आहे मात्र तुमच्याकडे किसान कार्ड नसेल तर तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत मिळणारे सहा हजार रूपये मिळणार नाहीत. बिहार सरकारने पीएस किसान योजनेबाबतचे काही नियम कडक केले आहेत. आता फक्त शेत जमीन असणे पुरेसे असणार नाही. तर पीएम किसान योजनेअंतर्गत निधी हवा असेल तर तुम्हाला शेत जमीन तुमच्या नावावर असण्यासोबतच तुमच्याकडे किसान कार्ड देखील असणं गरजेचं आहे.
शेतकऱ्यांची नोंदणी आणि किसान कार्ड तयार होत नाहीये कारण बिहार राज्यातील अनेक शेतकरी बाहेरच्या राज्यात काम करण्यासाठी जात आहेत. त्यांना शेतकरी ओळख पत्र तयार करण्यासाठी अडचण येत आहे. येणाऱ्या काही दिवसात खत, बियाणे यासह अनेक योजनांचे लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख पत्र असणं गरजेचं आहे. आता ही नोंदणी त्याच शेतकऱ्यांची होत आहे ज्यांच्या नावावर जमीन आहे. कृषी विभागाच्या पोर्टलवर जवळपास २ कोटी जमीन धारक शेतकरी आणि जमीन नसरणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
पीएम किसान सन्मान योजनेबाबत आता केंद्र सरकारने देखील निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे त्यांनाच पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. आता शेतकऱ्यांचे विशिष्ट ओळख पत्र असणार आहे. एका कुटुंबात पती आणि पत्नीला वेगवेगळी रक्कम मिळणार नाही. आयकर भरणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांचे किसान कार्ड नाहीये त्यांना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. सध्याच्या घडीला ३२ लाखांपेक्षा जास्त लोकांचे किसान कार्ड नाहीये.
पहिल्या टप्प्यात पीएम किसान सन्मान निधीचे ८५.५३ लाख लाभार्थींचे ओळख पत्र तयार करायचे आहे. त्यातील ५३.४५ लाख लोकांचे ओळख पत्र तयार करण्यात आले आहे. जवळपास ३२ लाख लोकांचे ओळख पत्र अजून तयार नाहीये. त्यांच्यावर शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजनांचा लाभापासून वंचित राहण्यााची टांगती तलवार आहे. तीनवेळी विशेष मोहीम राबवून देखील ही संख्या काही वाढलेली नाही. यातील सर्वात मोठी समस्या ही शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन नसल्याची आहे.