

Agriculture Leadership Award 2026
प्रशांत वाघाये
नवी दिल्ली : नवी दिल्लीत झालेल्या १७ व्या ॲग्रिकल्चर लीडरशिप कॉन्क्लेव्ह २०२६ मध्ये राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना प्रतिष्ठेचा 'ॲग्रिकल्चर लीडरशिप अवॉर्ड' प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कृषी, पर्यावरण आणि शाश्वत विकास क्षेत्रातील अनेक दशकांच्या योगदानाबद्दल पटेल यांचा हा गौरव केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री चिराग पासवान, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, माजी सरन्यायाधीश न्या. पी. सतशिवम, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप शाही, ॲग्रिकल्चर टुडेचे संस्थापक डॉ. एम. जे. खान यांच्यासह देश-विदेशातील कृषी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पटेल यांनी बांबूपासून बायोफ्युएल निर्मिती हा भारतासाठी येत्या काळातील सर्वात महत्त्वाचा पर्याय असल्याचे प्रतिपादन केले. बांबू हे झपाट्याने वाढणारे, कमी पाण्यावर येणारे आणि पर्यावरणाला पूरक असे पीक असून त्यापासून विविध प्रकारचे बायोफ्युएल तयार करता येते.
यामुळे जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी होईल, देशाचा प्रचंड इंधन आयात खर्च वाचेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीपलीकडे उत्पन्नाचे हक्काचे नवे साधन मिळेल, असे ते म्हणाले.
बांबूच्या पर्यावरणीय फायद्यांवरही त्यांनी भर दिला. बांबू वातावरणातील कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात शोषून घेतो आणि भरपूर ऑक्सिजन सोडतो, त्यामुळे हवामान बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी तो वरदान ठरतो.
बांबूची मजबूत मुळे जमिनीची धूप थांबवतात, सुपीकता टिकवतात आणि उजाड जमिनीलाही नवसंजीवनी देतात. कमी पाणी आणि कमी खतांवर येणारे हे पीक शाश्वत शेतीसाठी आदर्श असल्याचे त्यांनी नमूद केले.