

Pakistan violates ceasefire for 10th consecutive day
जम्मू-काश्मीर : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तानने काल सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीच उल्लंघन केलं आहे. काल रात्री पाकिस्तानी सैन्याकडून जम्मू काश्मीर मधील सीमेवर गोळीबार करत पुन्हा एकदा भारताला उकसवण्याचा प्रयत्न केला आहे. याला भारतीय सैन्याचेही जशाच तसे उत्तर दिले आहे.
पाकिस्तानी सैन्याने जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूरच्या LoC वर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. याला भारतीय सैन्याकडून पाकला जोरदारपणे प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार करत त्यांची अमानुषपणे हत्या केली होती. त्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर भारत सरकारने कडक पावले उचलीत पाकिस्तानविरोधात कडक भूमीका घेतली आहे. तसेच पाकिस्तानची सर्व स्तरावर कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या कडक भूमिकेने पाकिस्तान चिंतेत असून पाकिस्तानी सैन्याने सलग दहाव्या दिवशी सीमेवर गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
भारताने पाकिस्तानशी होणारी आयात निर्यात थांबवून पकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे धोरण आखले आहे. पाकिस्तानातील नागरिकांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांची संख्याही कमी करण्यात आली. तसेच सिंधू पाणी वाटप करार स्थगीत करून भारताने पाकिस्तानची पाणीबाणी केली आहे. यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानच्या मंत्र्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य येत आहे.
दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारने कडक पावले उचलत सीमेपार पाकिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादाला संपवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदी यांनी तीन्ही दलांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेवून पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मुळासकट उपटून काढण्यासाठी आणि दहशतवादाला मूठमाती देण्यासाठी पूर्ण सूट दिली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानने कल्पनाही केली नसेल असे प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या या भूमिकेने पाकिस्तान घाबरून गेला असून, त्याने सीमेवर सैन्य जमावाजमव केली आहे. तसेच पाकिस्तानी मंत्री अणुहल्ल्याची धमकी देत आहेत.