Pahalgam Attack
जम्मू-काश्मीर : पहलगाम हल्ल्यानंतरही जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. रविवारी रात्रीही पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांच्या विरुद्ध सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी विनाकारण गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्यानेही त्याला प्रभावीपणे प्रत्युत्तर दिले.
भारत खूप धोकादायक आणि निर्णायक पद्धतीने बदला घेईल, याची पाकिस्तानला भीती आहे. या भीतीमुळे पाकिस्तान अस्वस्थ असून नियंत्रण रेषेवर (एलओसी) सतत गोळीबार करत आहे. पाकिस्तानच्या सैन्याने सलग तिसऱ्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन केले. या गोळीबाराला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले.
भारतीय लष्कराच्या म्हणण्यानुसार, २६-२७ एप्रिल २०२५ च्या रात्री, पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांनी तुतमारी गली आणि रामपूर सेक्टरसमोर नियंत्रण रेषेवर विनाकारण गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्याने त्याला चोख प्रत्युत्तर दिले.
पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. यात २६ जणांची निर्घृण हत्या झाली. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारला, त्यांची ओळखपत्रे तपासली आणि नंतर त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हापासून, भारताने याचा बदला घेण्याचा वज्रनिर्धार केला आहे, त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. सिंधू पाणी कराराच्या निलंबनापासून ते पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यापर्यंत, भारताने पाकिस्तानवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.