

MHA Asked several states to conduct Mock Drills on 7th May 2025
नवी दिल्ली : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने देशातील काही राज्यांना 7 मे रोजी नागरी संरक्षण (Civil Defence) मॉक ड्रिल आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती डीडी न्यूजने दिली आहे.
हवाई हल्ल्याचा इशारा देणाऱ्या सायरनचे प्रयोग
विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी नागरी संरक्षण प्रशिक्षण
Blackout Measures म्हणजे रात्रीच्या वेळी दिवे बंद ठेवण्याचे सराव
महत्त्वाच्या ठिकाणे ओळखणार नाहीत अशा पद्धतीने लवकरात लवकर आच्छादित करणे (Camouflage)
आपत्ती काळात स्थलांतर (Evacuation) योजनेचा सराव
गृह मंत्रालयाने घेतलेल्या या मॉकड्रिल्सच्या निर्णयामागे मुख्य कारण म्हणजे जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकताच झालेला भीषण दहशतवादी हल्ला. या हल्ल्यात 26 नागरिकांचा मृत्यू झाला.
हल्ल्याची जबाबदारी सुरुवातीला The Resistance Front (TRF) या संघटनेने घेतली, जी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे मानले जाते. मात्र, काही तासांतच TRF ने जबाबदारी घेण्यास नकार दिला होता.
LOC वर सतत शस्त्रसंधी उल्लंघन
या हल्ल्यानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन पाकिस्तानकडून सलग 11 दिवसांपासून सुरू आहे. याच दरम्यान पाकिस्तानने पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या दोन क्षेपणास्त्रांची चाचणी केली. त्यांच्या सैन्याची "तयारी" दाखवणे हा त्यापाठीमागचा उद्देश होता.
भारत सरकारने या हल्ल्यानंतर कठोर पावले उचलली आहेत: सिंधू जल वाटप करार (1960) स्थगित, डिप्लोमॅटिक संबंध कमी केले, अटारी सीमारेषा बंद, सार्क करारानुसार मिळणारी व्हिसा सवलत रद्द, भारतात असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश
सैन्य आणि नौदलाची हालचाल
भारतीय लष्कराने LOC वर समर्पक प्रत्युत्तर दिले आहे. INS Surat या नव्या स्वदेशी क्षेपणास्त्र विध्वंसक नौकेने समुद्रावर झेपावणारे क्षेपणास्त्र यशस्वीरित्या पाडले, अशी माहिती भारतीय नौदलाने दिली.
संरक्षण सचिव राजेशकुमार सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सोमवारी भेट घेतली. दोघांमध्ये महत्वाची बैठक झाली. त्याआधी, वायूदलप्रमुख ए. पी. सिंग यांनीही पीएम मोदींची भेट घेऊन सुरक्षा परिस्थितीबाबत चर्चा केली.
देशातील संरक्षणाच्या दृष्टीने नागरिकांची सज्जता वाढवणे हा या मॉक ड्रिल्समागील उद्देश आहे. नागरी संरक्षण मॉक ड्रिल्समुळे संकटांच्या काळात लोकांची कृतीशक्ती व सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढणार आहे.