

TMC crisis Mamata Banerjee vs Yusuf Pathan : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर तृणमूल काँग्रेस (TMC) मध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. दररोज कोणी ना कोणी पक्ष किंवा पदाचा राजीनामा देत आहे. ८० पैकी ५८ टीएमसी आमदार बंडखोर झाले असून त्यांनी विरोधी पक्षनेत्याचीही निवड केली आहे. या सगळ्यासंदर्भात, आता ममता बॅनर्जी दिल्लीच्या राजकारणात उतरण्याची तयारी करत आहेत. यासाठी त्या लोकसभेत जाण्याच्या तयारीत आहेत. सध्याच्या समीकरणांनुसार, ममता बॅनर्जी यांना लोकसभेत पोहोचण्यासाठी त्यांच्याच पक्षाच्या एखाद्या खासदाराचा राजीनामा घ्यावा लागेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासाठी त्यांनी माजी क्रिकेटपटू व बहरामपूरचे टीएमसी खासदार युसूफ पठाण यांना राजीनामा देण्यास सांगितले होते, परंतु पठाण यांनी त्यास साफ नकार दिला आहे.
'इंडिया टीव्ही'ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, लोकसभेत जाण्याची इच्छा असलेल्या ममता बॅनर्जी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. युसूफ पठाण यांनी बहरामपूर मतदारसंघातून राजीनामा द्यावा आणि तिथे जेव्हा पोटनिवडणूक होईल, तेव्हा स्वतः उमेदवार म्हणून निवडणूक लढवावी, अशी ममता बॅनर्जी यांची योजना होती. मात्र, यासाठी जेव्हा पठाण यांच्याशी संपर्क साधण्यात आला, तेव्हा त्यांनी राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
बहरामपूरमध्ये ५० टक्क्यांहून अधिक मुस्लिम लोकसंख्या आहे. त्यामुळे इथून निवडणूक लढवणे अधिक सुरक्षित असेल, असे ममता बॅनर्जी यांचे मत आहे. पण ही लढाई तितकी सोपी नाही, कारण काँग्रेसचे माजी खासदार अधीर रंजन चौधरी हे देखील प्रदीर्घ काळ इथून खासदार राहिले आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत युसूफ पठाण यांनी त्यांचा पराभव केला होता.
युसूफ पठाण यांनी राजीनामा दिला असता, तरीही ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे सोपे नसले असते. कारण काँग्रेसकडून पुन्हा अधीर रंजन चौधरी मैदानात उतरले असते आणि जुना चेहरा असल्याने त्यांना याचा नक्कीच फायदा झाला असता. परंतु, या सर्व शक्यतांआधीच युसूफ पठाण यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आता जोपर्यंत ममता बॅनर्जी इतर कोणत्याही खासदाराला राजीनामा देण्यासाठी तयार करत नाहीत, तोपर्यंत त्यांचे लोकसभेत पोहोचणे अशक्य आहे.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. टीएमसीचे ज्येष्ठ नेते फिरहाद हकीम यांनी आज कोलकाता महानगरपालिकेच्या (KMC) महापौर पदाचा राजीनामा दिला. आपल्याला योग्य पद्धतीने काम करता येत नव्हते, म्हणूनच आपण हा निर्णय घेतल्याचे हकीम यांनी सांगितले. पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांची संमती मिळाल्यानंतर आपण 'अभिमानाने मान उंच ठेवून' पदाचा राजीनामा दिल्याचं त्यांनी नमूद केलं. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील राजकीय उलथापालथीच्या दरम्यान, राज्याचे माजी मंत्री आणि पक्षाचे प्रमुख चेहरे असलेल्या हकीम यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत हकीम यांनी महानगरपालिकेचे प्रमुख म्हणून आपल्या साडेसात वर्षांच्या कार्यकाळाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच कोलकाता शहरातील कठीण प्रसंगात साथ दिल्याबद्दल केएमसी अधिकारी आणि कोलकाता येथील जनतेचे आभार मानले.