

TMC rebel crisis : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. टीएमसीच्या बंडखोर गोटात अवघ्या २४ तासांतच असंतोषाचे सूर उमटू लागले आहेत. ५८ बंडखोर आमदारांनी बुधवारी तृणमूल काँग्रेस विधिमंडळ पक्षावर ताबा मिळवला होता, मात्र आता ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील या बंडखोर गटात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. अनेक आमदारांनी स्पष्ट केले आहे की, ममता बॅनर्जी यांच त्यांच्या सर्वोच्च नेत्या (सुप्रिम लीडर) राहतील. जर ममता बॅनर्जी यांना केवळ सल्लागार बनवून ठेवले गेले, तर आपण या बंडखोर गटात राहण्याबाबत पुनर्विचार करू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बंडखोर विधिमंडळ पक्षाचे नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीनंतरच बंडखोर गटात वेगवेगळे सूर उमटू लागले. यावरून बंडखोरांसमोर आता मोठे संकट उभे राहिले असल्याचे स्पष्ट होत आहे. एकीकडे त्यांना पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यापासून अंतर ठेवायचे आहे, तर दुसरीकडे टीएमसीच्या संस्थापक ममता बॅनर्जी यांच्याशी असलेले आपले राजकीय आणि भावनिक नातेही कायम ठेवायचे आहे.
बैठक संपल्यानंतर पांचलाचे बंडखोर आमदार गुलशन मल्लिक यांनी पत्रकारांशी उघडपणे संवाद साधला. ते म्हणाले, "आम्हाला सांगण्यात आले होते की पक्ष ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालीच पुढे जाईल. त्या केवळ एक सल्लागार नाहीत. पक्ष पूर्णपणे त्यांच्याच नेतृत्वाखाली चालावा अशी आमची इच्छा आहे."
बुधवारी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या एका प्रस्तावानंतर सुरू झाला. ऋतब्रत यांनी सुचवले होते की, माजी मुख्यमंत्र्यांना (ममता बॅनर्जी) पुनर्गठित विधिमंडळ पक्षाचे मुख्य सल्लागार बनवले जावे. गुलशन मल्लिक यांनी यावरच तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, जर ममता बॅनर्जी यांना सर्वोच्च नेत्या म्हणून स्वीकारले गेले नाही, तर आपल्याला या गटात राहायचे की नाही याचा विचार करावा लागेल. या विधानामुळे या बंडातील सर्वात मोठा अंतर्विरोध समोर आला आहे. हे संपूर्ण बंड ममता बॅनर्जी यांच्या नावावरच पुकारण्यात आले आहे, मात्र आता स्वतः ममता बॅनर्जी यांची भूमिका काय असेल? यावरूनच वाद सुरू झाला आहे. बंड करणाऱ्या ५८ आमदारांनी सुरुवातीपासूनच एकच गोष्ट वारंवार सांगितली होती की, त्यांचा लढा ममता बॅनर्जी यांच्या विरोधात नाही. ते केवळ ममता यांचे पुतणे आणि पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या वाढत्या प्रभावाच्या विरोधात आहेत.
सीतई येथील आणखी एक बंडखोर आमदार संगीता रॉय बसुनिया यांनीही मल्लिक यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. त्या म्हणाल्या, "ममता बॅनर्जी आमच्या सर्वोच्च नेत्या आहेत आणि नेहमीच राहतील. त्या सल्लागार असू शकत नाहीत, त्या आमच्या नेत्या आहेत." ऋतब्रत यांनी खरं तर ममता बॅनर्जी यांना सल्लागार बनवण्याचा प्रस्ताव एका रणनीतीचा भाग म्हणून दिला होता. त्यांना या बंडाचे राजकीय परिणाम कमी करायचे होते. तसेच हे आंदोलन पक्षाच्या सर्वेसर्वा यांच्या विरोधात नाही, असा विश्वास तृणमूलच्या सामान्य कार्यकर्त्यांना द्यायचा होता. परंतु, गुरुवारी आलेल्या विधानांवरून हे स्पष्ट झाले आहे की, बंडखोर गटातील एक मोठा वर्ग ममता बॅनर्जी यांचे अधिकार कमी करणाऱ्याबाबत कमालीचा नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.