पुढारी ऑनलाईन डेस्क : परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी भारताविषयी पाश्चिमात्य मीडियाच्या रिपोर्टिंगवर सवाल उपस्थित केले आहेत. जागतिक मीडिया सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणूक मतदानात भारतीय मतदारांच्या निवडीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, भारतातील 'खान मार्केट गँग' प्रमाणेच त्यांचा जागतिक विस्तारही अस्तित्वात आहे जो भारतीय राजकारणाच्या दिशेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे.
जयशंकर यांनी पाश्चिमात्य माध्यमांकडून भारताविषयी जे चित्र निर्माण केले जात आहे त्यावर भाष्य केले. "आज देशात, एक विशिष्ट विचार प्रक्रिया अथवा ज्यासाठी हक्कदारी प्रक्रिया आहे आणि मला सांगायचे आहे, 'खान मार्केट गँग' असे त्याचे एक अतिशय चांगले वर्णन आहे. मला तुम्हाला सांगायचे आहे की एक 'इंटरनॅशनल खान मार्केट गँग'देखील आहे," असे जयशंकर म्हणाले.
"हे असे लोक आहेत जे इथल्या हक्कदार लोकांशी एकप्रकारे जोडलेले आहेत. ते त्यांच्याशी सामाजिकदृष्ट्या सोयीस्कर आहेत. ते त्यांना ओळखतात. त्यांना असे वाटते की ते समान दृष्टिकोन बाळगतात. त्यांची प्रामुख्याने एक प्रकारची उच्चभ्रू, डावे-उदारमतवादी विचारप्रक्रिया आहेत. त्यामुळे दोघांमध्ये जवळचे नाते आहे." असे जयशंकर यांनी नमूद केले
खान मार्केट हे दिल्लीच्या मध्यभागी इंडिया गेटजवळील एक अलिशान शॉपिंग मार्केट आहे. "खान मार्केट गँग" हा शब्द भाजपने विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी वापरला आहे.
जयशंकर पुढे म्हणाले की जेव्हा जेव्हा "देशातील खान मार्केट गँग" डाऊन पडते तेव्हा "इंटरनॅशनल खान मार्केट गँग" त्याला पाठिंबा देते.
"जेव्हा 'देशांतर्गत खान मार्केट' डाऊन होते, तेव्हा 'आंतरराष्ट्रीय खान मार्केट गँग'ला वाटते की त्यांनी या लोकांना प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे आवश्यक आहे. भारतीय राजकारणाची दिशा प्रभावित करण्याचा अतिशय स्पष्ट प्रयत्न केला जात आहे." असेही ते म्हणाले.
जयशंकर यांनी, भारतात देशविरोधी इकोसिस्टम कार्यरत असल्याचे सांगत त्याला त्यांनी आंतरराष्ट्रीय खान मार्केट गँग म्हटले आहे. ते म्हणाले, 'हा तथाकथित उदारमतवादी, पाश्चिमात्य विचारसरणीच्या लोकांचा गट आहे, जो निवडणुकीच्या वेळी भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक स्वतःच्या फायद्यासाठी भारतीय राजकारणाची दिशा प्रभावित करू इच्छितात.'
यापूर्वी २२ मे रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने तृणमूल काँग्रेस सरकारच्या अंतर्गत २०१० पासून बंगालमध्ये जारी केलेले इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रमाणपत्रे रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना 'खान मार्केट गँग'चा उल्लेख केला होता. उच्च न्यायालयाचा निकाल हा 'खान मार्केट गँग'ला बसलेली चपराक असल्याचे पीएम मोदी यांनी म्हटले होते.
हे ही वाचा :