

Sonam Wangchuk Hunger Strike: शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा मंगळवारी 18वा दिवस होता. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करून आवश्यक असल्यास वैद्यकीय देखरेखीखाली आहार द्यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका (PIL) दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
ही याचिका सामाजिक कार्यकर्ते आणि वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली आहे. याचिकेनुसार, उपोषण सुरू झाल्यापासून वांगचुक यांचे वजन सुमारे 8.5 किलो घटले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, उपोषण असेच सुरू राहिल्यास पुढील दोन दिवसांत वांगचुक यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयाने तातडीने हस्तक्षेप करून त्यांना सरकारी रुग्णालयात हलवण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
याचिकेनुसार, जर गरज भासली तर वांगचुक यांच्या इच्छेविरुद्धही डॉक्टरांच्या देखरेखीखाली आवश्यक पोषकतत्त्वे, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला द्रवरूप आहार देण्यात यावा. याचिकाकर्त्यांच्या मते, त्यांचे प्राण वाचवणे हे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे.
याचिकेत केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वांगचुक यांच्या प्रकृतीची पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत, त्यांना एखाद्या गंभीर गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, शांततापूर्ण आंदोलन आणि उपोषण हा लोकशाहीतील मूलभूत अधिकार असला, तरी प्रत्येक नागरिकाचा जीव आणि आरोग्य सुरक्षित ठेवण्याची घटनात्मक जबाबदारी राज्यावर आहे.
याचिकाकर्त्यांनी भारतीय न्याय संहितेतील (Bharatiya Nyaya Sanhita) संबंधित तरतुदींचाही उल्लेख करत, एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असताना प्रशासनाने केवळ प्रेक्षकाची भूमिका घेऊ नये, असे म्हटले आहे.
सोनम वांगचुक यांनी 28 जूनपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ते Cockroach Janta Party (CJP) आयोजित आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनात NEET आणि इतर स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहारांप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
आंदोलनाच्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार, उपोषणामुळे वांगचुक यांचे वजन सुमारे 8.5 किलोने घटले असून त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना पाठिंबा देतानाच अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
यापूर्वी लेखिका अरुंधती रॉय, अभिनेते नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह आणि अर्थतज्ज्ञ जयती घोष यांनीही वांगचुक यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवत, त्यांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे आणि उपोषण थांबवण्याचे आवाहन केले होते.
दरम्यान, ही याचिका तातडीने सुनावणीसाठी घेण्याची विनंती करण्यात आली असली, तरी दिल्ली उच्च न्यायालय वकील संघटनेच्या कामबंद आंदोलनामुळे या प्रकरणाची सुनावणी नेमकी कधी होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.