

Bee Attack In Cricket Match: भारतात सध्या टी २० वर्ल्डकपचा फिव्हर आहे. सगळीकडे क्रिकेटची चर्चा असताना याच क्रिकेटच्या मैदानातून एक वेदनादायी बातमी समोर आली आहे. मधमाशा एखाद्या माणसाचा जीव कसा घेऊ शकतात हे दर्शवणारी एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. उन्नाव जिल्ह्यात एका क्रिकेट सामन्यावेळी मधमाशांनी हल्ला केल्यानं सगळीकडं एकच गोंधळ उडाला. मधमाशांनी अचानक हल्ला केल्यानं मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंना सावरण्याची संधीच मिळाली नाही.
हा सामना गंगाघाट नगर पालिका क्षेत्रातील सप्रू क्रिकेट स्टेडिमवर सुरू होता. ड्रिंक्स ब्रेकवेळी अचानक मधमाशांचा एक मोठा जत्था आला आणि त्यांनी खेळाडू, अंपायरवर हल्ला केला. मधमाशांच्या या जबर हल्ल्यात कानपूर क्रिकेट असोसिएशनचे वरिष्ठ अंपायर माणिक गुप्ता गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार सप्रू क्रिकेट स्टेडियमवर YMCCआणि पारामाऊंट या दोन संघात सामना सुरू होता. पहिला डाव संपल्यानंतर दुसरा डाव सुरू झाला होता. त्यानंतर काही षटकातच अंपायर्सनी ड्रिंक्सचा कॉल दिला होता. यावेळीच मधमाशांनी अचानक हल्ला केला. या हल्ल्यापासून वाचण्यासाठी खेळाडू आणि पंच जमिनीवर आडवे झाले. मात्र मधमाशांनी हल्ला करणं सुरूच ठेवलं. त्यांनी अनेक लोकांना डंख मारणं सुरू केलं.
प्रत्यक्षदर्शी दुसरे अंपायर सुनिल कुमार निषाद यांनी सांगितलं की, 'मैदानावर असलेले जवळपास सर्व खेळाडू आणि अंपायर मधमाशांचे शिकार झाले. जखमी माणिक गुप्ता यांना आधी शुक्लागंज रूग्णालयात घेऊन जाण्यात आलं. त्यांना तिथं कानपूरमध्ये घेऊन जावा असं सांगितलं. त्यानंतर त्यांना हॅलट रूग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. माणिक गुप्ता कानपूरच्या फीलखाना भागात रहात होते. ते अनेक वर्षापासून क्रिकेट अंपायरिंग करत होतं.
या घटनेनंतर खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिक लोकांच्या मते मैदानाच्या जवळपास सुरक्षेचे उपाय केले पाहिजेत जेणेकरून भविष्यात अशी घटना घडणार नाही. दुसरीकडं अंपायरच्या मृत्यूमुळ त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून क्रिकेट जगत देखील हळहळ व्यक्त करत आहे.