

नवी दिल्ली : भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविरोधात काँग्रेस पक्ष देशभरात किसान संमेलनाचे आयोजन करणार आहे. महाराष्ट्रातील यवतमाळसह मध्य प्रदेशात भोपाळ आणि राजस्थानच्या श्री गंगानगर येथे या संमेलनांचे आयोजन केले जाणार आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत या संमेलनाची रणनीती ठरवण्यात आली. या बैठकीला खर्गे यांच्यासह लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, संघटन सरचिटणीस के. सी . वेणुगोपाल, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, राज्यसभा खासदार रजनी पाटील यांच्यासह जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेते उपस्थित होते.
बैठकीत भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा झाली. या व्यापार कराराचा परिणाम या सहा राज्यांमधील कापूस, सोयाबीन, मका शेतकरी आणि फळे आणि काजू उत्पादकांवर होईल, अशी माहिती माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी बैठकीनंतर दिली. किसान संमेलनात काँग्रेस अध्यक्ष खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, पंतप्रधान मोदी यांनी शरणागती पत्करल्याची टीका केली.
या व्यापार कराराचा देशातील शेतकऱ्यांवर नकारात्मक परिणाम होईल. म्हणून, पहिल्या टप्प्यात, आम्ही सहा राज्यांमधील शेतकरी संघटनांसोबतच्या व्यापार कराराविरुद्ध आवाज उठवू, असे जयराम रमेश म्हणाले.
बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अमेरिकेसोबत केलेला व्यापार करार रद्द करण्याची आवश्यकता आहे, मनरेगा पुन्हा सुरू केली पाहिजे. पंतप्रधान मोदींनी देशासोबत विश्वासघात केला, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे आणि अर्थव्यवस्था बुडवण्याचा हा प्रयत्न आहे. या विरोधात जनतेचा रेटा निर्माण झाला पाहिजे.