

CBSE Class 12 result
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता १२ वीच्या निकालाबाबत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये अदलाबदल झाल्याची गंभीर चूक सीबीएसई बोर्डाने अखेर मान्य केली आहे. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी याविरोधात आवाज उठवल्यानंतर बोर्डाला जाग आली असून, आता संबंधित विद्यार्थ्यांचे गुण सुधारले जाणार असल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
'वेदांत' नावाच्या एका विद्यार्थ्याने निकालानंतर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी अर्ज केला होता. त्याला मिळालेली भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका त्याची नसून दुसऱ्याच कोणा विद्यार्थ्याची असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. वेदांतने हा सर्व प्रकार सोशल मीडियावर शेअर करत बोर्डाच्या कारभारावर आक्षेप घेतला. हा घोळ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सीबीएसई प्रशासनात खळबळ उडाली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीबीएसईच्या संयुक्त सचिवांनी थेट वेदांतला ईमेल पाठवून या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली. "तुमची भौतिकशास्त्राची खरी उत्तरपत्रिका या ईमेलसोबत जोडली असून, नवीन गुणांनुसार तुमचा निकाल लवकरच अपडेट केला जाईल," असे बोर्डाने या ईमेलमध्ये स्पष्ट केले आहे.
केवळ भौतिकशास्त्रच नव्हे, तर रसायनशास्त्र या विषयाच्या उत्तरपत्रिकेतही असाच घोळ झाल्याचे आणखी एका विद्यार्थ्याने समोर आणले आहे. या विद्यार्थ्यानेही सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले की, "सीबीएसईने आमच्या ईमेलला उत्तर दिले असून रसायनशास्त्राच्या उत्तरपत्रिकेबाबतची आमची तक्रार योग्य असल्याचे मान्य केले आहे. पुढील प्रक्रियेसाठी आम्ही बोर्डाच्या निर्णयाची वाट पाहत आहोत."
वेदांतचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होताच सीबीएसईने थेट विद्यार्थ्याशी संपर्क साधला. बोर्डाच्या निकालाबाबत सोशल मीडियावर येणाऱ्या प्रत्येक तक्रारीवर लक्ष ठेवण्यासाठी सीबीएसईने आता एक विशेष टीम तैनात केली आहे. निकालानंतर गुणांची पडताळणी करणे, उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मिळवणे आणि पुनर्मूल्यांकन करणे यासाठी बोर्ड फी आकारते. मात्र, विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाच एकमेकांमध्ये बदलल्या गेल्याचा प्रकार समोर आल्याने सीबीएसईच्या एकूणच मूल्यमापन आणि उत्तरपत्रिका हाताळणीच्या सुरक्षिततेवर पालकांमधून आणि विद्यार्थ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.