

West Bengal Election Violence: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. मात्र मतदानावेळी राज्यातील अनेक ठिकाणी हिंसाचार उसळला. एकीकडे मतदानासाठी मतदार केंद्राबाहेर मोठी गर्दी करत असताना दुसरीकडं राज्यातील अनेक ठिकाणी जाळपोळ, मारामारी आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत.
मुर्शिदाबाद, कूचबिहार, सिलिगुडी आणि मालदा इथं तुफान दंगा झाला आहे. मुर्शिदाबादमध्ये समाज कंटकांनी हुमायू कबीर यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यावर काठ्या आणि विटांनी हल्ला केला होता. भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर देखील हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मुर्शिदाबादच्या नौदामध्ये AJUP प्रमुख आणि रेजीनगरचे उमेदवार हुमायू कबीर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यामुळं मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला. याचवेळी टीएमसी आणि एजेयूपीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. कबीर यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची देखील झाली. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
कूचबिहारच्या तुफानगंज भागात मतदानावेळी मोठी गर्दी निर्माण झाली होती. त्यामुळं तिथं परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय सशक्त दलाचे जवान तैनात करण्यात आले. सीएपीएफने लाठीचार्ज करत गर्दी नियंत्रणात आणली. काही समाज कंटक मतदारांना धमाकवण्याचा प्रयत्न करत होते असा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर हा लाठीचार्ज झाला
दक्षिण दिनाजपूरचे कुमारगंज विधानसभा मतदार संघातून देखील एक मोठी बातमी येत आहे. तिथं भाजपचे उमेदवार सुवेंदू सरकार यांच्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप होत आहे. सांगितलं जात आहे की सुवेंदू सरकार यांना बूथ जॅमिंग होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ते तिथं आपली टीम घेऊन पोहचले.
त्यावेळी त्यांच्यावर काठी आणि लाथा बुक्यांनी हल्ला करण्यात आला. सुवेंदु सरकारने पोलिसांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी त्यांना मारहाण केल्याचा देखील आरोप केला आहे.
मालदामध्ये देखील मोथाबाडी मतदार संघातील एका मतदान केंद्रात इव्हीएम खराब झाल्यामुळं स्थानिक लोकांचा राग अनावर झाला. लोकांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यावर राग व्यक्त करत त्याला जवळपास बंधक बनवलं होतं. ते या अधिकाऱ्याचा हात पकडून त्याला मारहाण करताना दिसत होते.
मालदामध्येच हरिश्चंद्रपूर मतदार संघात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तृणमूल काँग्रेसचे दोन गटच एकमेकांना भिडले. वाद इतका टोकाला गेला की विद्यमान मंत्री ताममुल हुसैन यांचे गाव बांगुरूआमध्ये टीएमसीच्या एका निवडणूक प्रचार कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.