

Faridabad horror
फरिदाबाद : हरियाणाच्या फरिदाबाद जिल्ह्यातील बल्लभगड रेल्वे स्टेशनजवळ मंगळवारी एक हृदयद्रावक घटना घडली. येथे एका व्यक्तीने त्याच्या चार मुलांना सोबत घेऊन गोल्डन टेम्पल एक्स्प्रेससमोर उडी मारून जीवन संपवले. ही घटना अनाज मंडी बल्लभगड जवळील रेल्वे उड्डाणपुलाखाली घडली. या घटनेची रेल्वेच्या लोको पायलटने रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. पाचजण एकाचवेळी रेल्वेखाली चिरडल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलात एकच खळबळ उडाली.
या घटनेनंतर रेल्वे पोलिसांसह स्टेशन प्रभारी घटनास्थळी दाखल झाले. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कारण प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मृत व्यक्तीचे नाव मनोज महतो (वय ३६) असे आहे. तो मुळचा बिहारचा असून तो बेलदारीचे काम करत होता. ही घटना इतकी भयानक होती की, मंगळवारी दुपारी मनोजने त्याच्या चार मुलांना रेल्वे रुळावर नेले. सर्वात लहान मुलगा तीन वर्षांचा तर मोठा नऊ वर्षांचा होता. सर्वांना रेल्वे रुळावर नेल्यावर त्याने त्यांचे हात घट्ट धरले होते. एक्स्प्रेस रेल्वे येईपर्यंत तो त्यांना घट्ट धरून राहिला आणि एका क्षणात पाचही जण होत्याचे नव्हते झाले.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्डन टेम्पल एक्सप्रेस त्यांच्या दिशेने येत असल्याचे पाहून मुलांनी वडील मनोज याला हात सोडण्याची विनवनी केली तरीही त्याने त्यांना जाऊ दिले नाही. 'दुपारी १.१० च्या सुमारास मुंबईहून आलेल्या रेल्वेखाली ते सापडले,' असे सरकारी रेल्वे पोलिस विभागाचे एसएचओ राजपाल यांनी सांगितले.
घरातून बाहेर पडताना मुलांना खेळण्यासाठी जवळच्या पार्कमध्ये घेऊन जात असल्याचे मनोजने त्याची पत्नी प्रियाला सांगितले होते. त्याने त्याच्या चार मुलांना खेळण्यासाठी पार्कमध्ये घेऊन जाण्याऐवजी त्यांना रेल्वे रुळांवर नेले. तो एल्सन चौक उड्डाणपुलाखाली सुमारे एक तास बसून रेल्वे येण्याची वाट पाहत राहिला. यादरम्यान त्याने मुलांना खाण्यासाठी चिप्स आणि सॉफ्ट ड्रिंक्सदेखील विकत घेऊन दिले.
या घटनेनंतर, लोको पायलटने बल्लभगड स्टेशनवरील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पोलिसांना मनोजचे आधार कार्ड सापडले असून त्यावरुन त्याची ओळख पटवली. तसेच त्याच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवर त्याच्या पत्नीचा फोन नंबर मिळाला.
जेव्हा मृत व्यक्तीची पत्नी प्रियाला फोन केला असता तिने रेल्वे पोलिसांना सांगितले की तिचा पती मुलांना बाहेर पार्कमध्ये फिरण्यासाठी घेऊन गेला आहे. तो लवकरच घरी परत येईल. पण तिला घटनास्थळी आणल्यानंतर, पती आणि मुलांचे मृतदेह पाहून ती बेशुद्ध पडली.