नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतात पण ज्या उद्देशाने आम्ही संबंधित निर्णय घेतले तो उद्देश चुकीचा नव्हता, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी फिक्की संघटनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था मजबूत झाल्याचा दावाही मोदी यांनी यावेळी केला. (Amit Shah)
गेल्या सात वर्षांच्या काळात देशात महत्वपूर्ण बदल झाले असल्याचे खुद्द टीकाकार देखील मान्य करतात, असे सांगून शहा पुढे म्हणाले की, रालोआ सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण सिद्ध झालेले नाही. तत्कालीन संपुआ सरकारच्या कार्यकाळात लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडण्यास सुरुवात झाली होती.
देशात बहुपक्षीय लोकशाही व्यवस्था चालणार की नाही, असा सवाल त्यावेळी लोकांतून उपस्थित केला जात असे. पण पंतप्रधान मोदी यांनी हा विश्वास जागृत ठेवण्याचे काम केले आहे.
केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास मजबूत झाला असल्याचे सांगत शहा म्हणाले की, जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाचा जीडीपी दर ८.४टक्के इतका नोंदविला गेला आहे.
चालू आर्थिक वर्षात जो जीडीपी दर साध्य होणार आहे, तो पाहता भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारा देश ठरणार आहे.
आगामी काळात जीडीपी दर दहा टक्क्यांच्या पुढे गेला तर मला त्याचे फारसे आश्चर्य वाटणार नाही.