लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याचा सुनियोजित कट ! केंद्रीय मंत्र्याच्या मुलाची SIT कडून पोलखोल | पुढारी

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याचा सुनियोजित कट ! केंद्रीय मंत्र्याच्या मुलाची SIT कडून पोलखोल

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याचा सुनियोजित कट होता अशी माहिती नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) दिली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने आशिष मिश्रावर लावण्यात आलेल्या कलमांमध्ये सुधारणा करण्यात यावी, असे पत्र न्यायाधीशांना लिहिले आहे. आशिष मिश्रा आणि इतरांवर यापूर्वीच या प्रकरणात खून आणि कट रचण्याचे आरोप आहेत. त्यात खुनाचा प्रयत्न आणि इतर आरोपही जोडले जावेत, अशी विशेष तपास पथकाची इच्छा आहे.

सत्ताधारी भाजप यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असताना, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यासाठी या घडामोडी मोठ्या अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. अजय मिश्रा यांना हटवण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले आहे. लखीमपूर खेरीच्या घटनेबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.

तीन ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. आशिष मिश्रा यांनी चालविलेल्या एसयूव्हीने शेतकर्‍यांच्या अंगावर घातल्याने चार शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. यानंतर हिंसाचार भडकला आणि आणखी चार जणांना, एका पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला.

शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्रा यांचे नाव आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चादरम्यान आशिष आपल्या कारमधून वेगाने लोकांना चिरडत गेला. या घटनेत आणि त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात चार शेतकरी आणि ताफ्यातील चार लोकांसह आठ जणांचा मृत्यू झाला.

हे ही वाचलं का ?

Back to top button