नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : sonia gandhi : शेतकरी आणि सामान्य नागरिकांच्या प्रती केंद्रातले मोदी सरकार असंवेदनशील असल्याची टीका काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत केली. सुमारे वर्षभर चाललेल्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदान व त्यागाचा काँग्रेसच्या खासदारांनी गौरव करावा, असेही त्या म्हणाल्या,
आवश्यक वस्तूंच्या दरात झालेल्या वाढीमुळे सामान्य माणसाचे मासिक बजेट कोलमडून पडले आहे, असे सांगतानाच वाढत्या महागाईसह शेती क्षेत्राची दैन्यावस्था, चीन सीमेवरील परिस्थिती, शेजारी देशांसोबतचे संबंध आदी मुद्द्यांवर सरकारने संसदेत चर्चा घ्यावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली.
काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठकीत प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या विषयावर खलबते झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अलिकडेच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारची कोंडी केली होती.
काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत नागालँडमध्ये सैनिकांकडून सामान्य नागरिकांच्या झालेल्या हत्येच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. सरकारने या प्रकरणी खेद व्यक्त केला असला तरी तेवढे पुरेसे नाही. अशा दुर्दैवी घटना टळाव्यात, याकरिता ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही सोनिया गांधी सांगितले. राज्यसभेच्या १२ खासदारांचे निलंबन संतापजनक आणि अभूतपूर्व असून, सरकारने घटना तसेच नियम पायदळी तुडवले असल्याची प्रतिक्रिया सोनियांनी या बैठकीत दिल्याचे समजते.
विरोधक एकसंध नाहीत. यावर काही चर्चा झाली का, असे विचारले असता राऊत म्हणाले की, या मुद्द्यावर चर्चा झाली. विरोधकांची आघाडी होणार असेल तर ती काँग्रेसशिवाय शक्य नाही.शिवसेनेने हा मुद्दा आधीच स्पष्ट केला आहे. महाराष्ट्रातील तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार हे मिनी यूपीएसारखेच आहे. शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद आहे आणि काँग्रेस व राष्ट्रवादी हे मित्रपक्ष सत्तेत सहभागी आहेत, असे त्यांनी सांगितले.
आपण आघाडीचे नेतृत्व केले पाहिजे, असा आग्रह मी राहुल गांधी यांच्याकडे धरल्याचे सांगून राऊत म्हणाले, आपण यासंदर्भात मोकळेपणाने बोलले पाहिजे, काम केले पाहिजे. अनेक पक्ष सध्या काँग्रेससोबतच्या आघाडीत आहेत. मग, वेगळी आघाडी कशासाठी, असे राऊत म्हणाले.
हेही वाचलं का?