

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
देशात गेल्या वर्षभरात एटीएममधून पैसे काढण्यापेक्षा मोबाईल पेमेंट्स (mobile payments) व्यवहार वाढले आहेत. हे पहिल्यांदाच असे घडले असून नागरिकांकडून आता कॅशलेस पेमेंटवर भर दिला जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी इनफिनिटी फोरममध्ये (InFinity Forum) बोलताना डिजिटल इंडिया उपक्रमांविषयी माहिती दिली.
सध्या बँकांचे व्यवहार पूर्णपणे डिजिटल स्वरुपात झाले आहेत. एका दशकापेक्षा कमी कालावधीत डिजिटल पेमेंट व्यवहार सामान्य होऊ शकतात, अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.
डिजिटल इंडिया अंतर्गत देशात अनेक नाविन्यपूर्ण उप्रकम हाती घेण्यात आले, नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या बाबतीत भारताने जगाला हे सिद्ध करुन दाखविले आहे. चलनाचा इतिहास उत्क्रांती दर्शवतो. जसा मानव उत्क्रांत होत गेला, तसे त्याच्या व्यवहारांचे स्वरूपही विकसित होत गेले. आधी वस्तू विनिमय प्रणाली नंतर धातूपर्यंत, नाण्यांपासून नोटांपर्यंत आणि आता धनादेश ते कार्डपर्यंत…आज आम्ही येथे पोहोचलो आहोत, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.
एका अहवालानुसार, देशात डिजिटल व्यवहारात वाढ झाली आहे. क्रेडिट-डेबिट कार्ड, नेट बँकिंग, गुगप पे, फोन पे, युपीआय याद्वारे डिजिटल व्यवहार वाढले आहेत. युपीआयची सुरुवातही २०१६ मध्ये झाली होती. ऑक्टोबर २०२१ मध्ये सुमारे ७.७१ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि १००० च्या नोटबंदी निर्णयाची घोषणा करुन पाच वर्ष पूर्ण झाली. ८ नोव्हेबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता मोदींनी याची घोषणा केली होती. त्याचवेळी पासून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या होत्या. यानंतर डिजिटल पेमेंट व्यवहारात (mobile payments) वेगाने वाढ झाली.