पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण मनी लाँडरिंग प्रकरणात बीआरएस नेत्या के कविता यांची न्यायालयीन कोठडी मंगळवार 23 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. आज मंगळवार (दि.९) त्यांची कोठडी संपल्यानंतर त्यांना दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने के कविता यांची कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवली आहे. ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) 15 मार्च 2024 रोजी अटक केली होती. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (K Kavitha)
कोर्टात हजर राहिल्यानंतर माध्यमांशी बोलतना बीआरएस एमएलसी के कविता म्हणाल्या, "हे प्रकरण पूर्णपणे विधानावर आधारित आहे. हे राजकीय प्रकरण आहे. विरोधी पक्षांना लक्ष्य करण्याचा हा खटला आहे", अशी टीका त्यांना केंद्र सरकार आणि तपास यंत्रणेवर केली आहे. सीबीआयने यापूर्वीच तुरुंगात माझे म्हणणे नोंदवले असल्याचेही कविता यांनी म्हटले आहे. (K Kavitha)
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात के.कविता सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आपल्या मुलाची परीक्षा असल्याच्या कारणावरून त्यांनी दिल्ली न्यायालयात अंतरिम जामीन मागितला होता. या अर्जाला ईडीने विरोध केला आहे. परंतु न्यायालयाने कोणताही निर्णय न देता, हा निर्णय राखून ठेवला आहे. दरम्यान त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी शनिवारी २० एप्रिल रोजी होणार आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
के. कविता या तेलंगणातील विधान परिषदेच्या सदस्य आहेत. दिल्लीतील मद्य धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी अमित अरोरा याने चौकशीदरम्यान के. कविता यांचे नाव घेतले होते. त्यानंतर कविता ईडीच्या रडारवर आल्या. ईडीने आरोप केला आहे की 'साउथ ग्रुप' नावाच्या लिकर लॉबीनं आणखी एक आरोपी विजय नायर यांच्यामार्फत 'आप' नेत्यांना 100 कोटी रुपयांची लाच दिली होती. आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या या प्रकरणात तुरुंगात आहेत. काही दिवसांपूर्वीच आप नेते खासदार संजय सिंह यांना जामीनावर सोडण्यात आले आहे. (K. Kavita News)
हेही वाचा: