Mann Ki Baat : आज प्रत्येक गावात ‘नमो ड्रोन दीदी’ची चर्चा’ ; PM नरेंद्र मोदी

Mann Ki Baat
Mann Ki Baat

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२५) 'मन की बात' कार्यक्रमाच्या 110 व्या भागात संबोधित केले. कार्यक्रमात पंतप्रधानांनी महिला शक्तीचे महत्त्व अधोरेखित करत 'नमो ड्रोन दीदीं'शी संवाद साधला. यावेळी आज प्रत्येक गावात 'नमो ड्रोन दीदी'ची चर्चा असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच लखपती दीदी बनवणे हे माझे ध्येय आहे, असे देखील पीएम नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात' कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केले. (Mann Ki Baat)

मन की बात कार्यक्रमात पंतप्रधान माेदी म्हणाले की, काही वर्षांपूर्वीपर्यंत कोणाला वाटले असेल का? की, आपल्या देशात खेड्यापाड्यात राहणाऱ्या महिलाही 'ड्रोन' उडवतील; पण आज हे शक्य होत आहे. आज प्रत्येक गावात ड्रोन दीदीची चर्चा आहे, 'नमो ड्रोन दीदी, नमो ड्रोन दीदी' असे शब्द प्रत्येकाच्या आज ओठावर आहेत. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल बोलत आहे. आज प्रत्येक गावात ड्रोन दीदीची चर्चा होत आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी सीतापूर येथील 'नमो ड्रोन दीदी'शी संवाद साधला. लखपती दीदी बनवणे हे माझे ध्येय असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले. (Mann Ki Baat)

देशाच्या कानाकोपऱ्यातील महिला आता नैसर्गिक शेतीचा विस्तार करत आहेत. आज देशात 'जल जीवन मिशन' अंतर्गत एवढी कामे होत असतील, तर त्यात पाणी समित्यांचा मोठा वाटा आहे. या पाणी समितीचे नेतृत्व केवळ महिलांकडे आहे. याशिवाय जलसंधारणासाठी बहिणी आणि मुली सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

वन्य प्राण्यांच्या कल्याणासाठी नवनवीन उपक्रम

पंतप्रधान म्हणाले की, आज तरुण उद्योजक वन्यजीवांसाठी नवनवीन शोध लावत आहेत. नदीतील मगरींवर लक्ष ठेवण्यास मदत करणारे ड्रोन एका तरुणाने विकसित केले आहे. एआय आणि इंटरनेट ऑफ थिंग्जवरही काम केले जात आहे. वन्य प्राण्यांच्या संवर्धनामुळे आपल्या देशाची जैवविविधता समृद्ध होत आहे. आपल्या देशात आपण निसर्ग आणि वन्यजीव सहजीवन जगत आलो आहोत, असेही पंतप्रधान माेदी म्‍हणाले.

सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात वाघांची संख्या वाढली

३ मार्च हा 'जागतिक वन्यजीव दिन' आहे. हा दिवस वन्य प्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. यावर्षी जागतिक वन्यजीव दिनाच्या थीममध्ये डिजिटल इनोव्हेशनला सर्वोपरि ठेवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत सरकारच्या प्रयत्नांमुळे देशात वाघांची संख्या वाढली आहे, असे पंतप्रधान माेदी यांनी यावेळी सांगितले.

तरूणांनी निवडणुक प्रक्रियेत अधिकाधिक सहभागी व्हावे

पीएम मोदी म्हणाले की, 'काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाने आणखी एक मोहीम सुरू केली आहे. ती म्हणजे 'माझे पहिले मत – देशासाठी'. याद्वारे प्रथमच मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उत्साह आणि उर्जेने भरलेल्या आपल्या युवा शक्तीचा भारताला अभिमान आहे. आपले तरुण निवडणूक प्रक्रियेत जितके जास्त सहभागी होतील तितके त्याचे परिणाम देशासाठी अधिक फायदेशीर असतील.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news