

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्ष (भाजप) अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा करण्याची नौटंकी करत आहे, असा गंभीर आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (दि.९) केला. माझा अशा सण, उत्सवावर विश्वास आहे की जो सर्वांना सोबत घेऊन जातो, सर्वांवर बोलतो. मी जिवंत असेपर्यंत हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधीच होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात एका कार्यक्रमाला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, साेमवारी (दि.८) माध्यमांकडून मला राम मंदिराबद्दल विचारण्यात आले. निवडणूकांपूर्वी तुम्हाला जे हवे ते करा. मला काही अडचण नाही; पण इतर समाजाच्या लोकांची अवहेलना करणे योग्य नाही. मी जिवंत असेपर्यंत हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कधीच होऊ देणार नाही.(Mamata Banerjee)
धर्म आणि श्रद्धेचा प्रश्न अत्यंत वैयक्तिक आहे. आमचा सामूहिकतेवर विश्वास आहे. इतर समाजाच्या लोकांची उपेक्षा करणे योग्य नाही. त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत धार्मिक विभाजन होऊ देणार नाही, असे देखील पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.