BJP Vs APP : हे तर केजरीवाल यांचे नाटक; भाजपची टीका | पुढारी

BJP Vs APP : हे तर केजरीवाल यांचे नाटक; भाजपची टीका

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीचे नाकारलेले समन्स आणि स्वतःच्या अटकेचे केलेले दावे केवळ नाटक आहे. व्हिक्टीम कार्ड खेळण्यासाठी केजरीवाल यांना ऑस्कर पुरस्कार मिळायला हवा, अशी खिल्ली भाजपने उडविली आहे. (BJP Vs APP)

मद्य गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून केजरीवाल यांना अटक होऊ शकते असे आम आदमी पक्षाकडून दावे केले जात असून, आज मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. तसेच ईडीकडून अटकेची भीती वर्तविली होती. यावर भाजप प्रवक्त्या बांसुरी स्वराज यांनी आम आदमी पक्षावर खरमरीत टिका केली. ईडीची कारवाई पूर्णपणे गोपनीय असते. असे असताना मुख्यमंत्री केजरीवाल आणि त्यांच्या मंत्री आतिशी कोणत्या आधारावर अटकेचे भाकित करत आहेत असा सवाल बांसुरी स्वराज यांनी केला. आपल्याला अटक होऊ शकते असे वातावरण तयार करून केजरीवाल नाटक करत आहेत. ईडीने आपल्याकडे यावे असे त्यांना वाटत असल्याचा चिमटाही बांसुरी स्वराज यांनी काढला. (BJP Vs APP)

तर, भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी नाटक करण्यासाठी आणि अन्यायपिडीत असल्याचे  व्हिक्टीम कार्ड खेळण्यासाठी केजरीवाल यांना व आम आदमी पक्षाला ऑस्कर पुरस्कार मिळायला हवा, असा टोला लगावला. लांडगा आला रे आला या गोष्टीतल्या लहान मुलासारखे आपचे झाले आहे, अशी कोपरखळी लगावताना पुनावाला म्हणाले की झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ज्याप्रकारे सात वेळा ईडीचे समन्स नाकारले आहे. तशाच प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी हे समन्स टळले आहे. (BJP Vs APP)

दरम्यान, भाजपचे अन्य प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी दिल्ली सरकारच्या मोहल्ला क्लिनीक व्यवस्थेतील कथित त्रुटींचा हवाला देत आम आदमी पक्ष सरकारला लक्ष्य केले. दिल्लीतील तथाकथित मोहल्ला क्लिनिकमध्ये तपासणी व्यवस्थेमध्ये एका दिवसात ५०० हून अधिक रुग्णांची तपासणी झाल्याचे म्हटले आहे. मोहल्ला क्लिनिकची अधिकत वेळ सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत असते. या २४० मिनिटात ५३३ रुग्ण आले असतील तर  अर्ध्या मिनिटात एका रुग्णाची तपासणी झाली असावी. डॉक्टरांना आजार समजून घेण्यासाठी आणि उपचारासाठी एवढा वेळ लागतो हा दिल्ली सरकारचा नवा प्रामाणिकपणा आहे,असा टोलाही सुधांशु त्रिवेदी यांनी लगावला.

हेही वाचा:

 

 

Back to top button