Delhi Air Pollution : बीएस ३ आणि बीएस ४ वाहनांवर बंदी | पुढारी

Delhi Air Pollution : बीएस ३ आणि बीएस ४ वाहनांवर बंदी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ श्रेणीत पोहोचल्याने दिल्ली सरकारची प्रदूषण नियंत्रणासाठी धावाधाव सुरू झाली आहे. याअंतर्गत दिल्लीतील अनावश्यक बांधकामांवर बंदी घालण्यात आली आहे. बीएस ३ आणि बीएस ४ इंजिन असलेल्या सर्व गाड्यांना दिल्लीत बंदी घालण्यात आली आहे. अशी वाहने आढळल्यास २० हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सर्व शाळांमध्ये दोन दिवसांची सुटीही देण्यात आली आहे.  (Delhi Air Pollution)

दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक काही ठिकाणी ४०० च्या पुढे गेला आहे. श्रेणी प्रतिसाद कृती कार्यक्रम ३ नुसार नियमावलीसह काही निर्बंध दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरात लागू करण्यात आले आहे. दिल्लीतील शाळांना देखील दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहीती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ली आहे. दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक काही ठिकाणी ४०० च्या पुढे गेला आहे. वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून आवश्यकता नसल्यास स्वतःची वाहने रस्त्यावर उतरवु नयेत, जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक पर्यायांचा वापर करावा, आजूबाजूला किंवा तुमच्या परिसरात आग लागल्याचे निदर्शनास आल्यास ग्रीन दिल्ली ॲपवर सूचित करावे, असे आवाहन दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केले आहे.

आताची परिस्थिती पाहता शनिवारपर्यंतचे निर्देश देण्यात आले आहे. रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारची परिस्थिती पाहुन नवे निर्देश सोमवारी देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी परिसरातील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी वाहनांच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. बीएस ३ आणि बीएस ४ इंजिन असलेल्या सर्व पेट्रोल आणि डिझेल चार चाकी गाड्यांना बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारची वाहने रस्त्यावर दिसल्यास त्यांच्यावर वीस हजार रुपये एवढा दंड आकारण्यात येणार आहे. असा निर्णय दिल्ली सरकारच्या परिवहन विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत बसेसच्या २४०० फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. शटल बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन मार्गावर ही सेवा सध्या सुरू आहे. यामुळे सरकारी कर्मचारी वर्गाने या माध्यमाद्वारे प्रवास करावा, दिल्ली मेट्रोच्या ६० अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकांनी वैयक्तिक वाहनांनी प्रवास न करता या माध्यमातून जास्तीत जास्त प्रवास करावा असे आवाहन दिल्ली सरकारने केले आहे.

Delhi Air Pollution : स्मॉग टॉवरवरून आरोप प्रत्यारोप 

एकीकडे दिल्लीतील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे आव्हान सरकारसमोर असताना स्मॉग टॉवरवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दिल्लीतील स्मॉग टॉवर बंद असल्याच्या कारणावरून दिल्ली सरकारमधील पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी केंद्र सरकार आणि संबंधीत यंत्रणांना धारेवर धरले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेल्या यंत्रणानी परस्पर निर्णय घेतल्यामुळे स्मॉग टॉवर बंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दिल्लीतील काही ठिकाणी हवा गुणवत्ता निर्दशांक ७०० पेक्षा जास्त आहे. मात्र दिल्लीतील कॅनॉट प्लेस भागातील स्मॉग टॉवरला दिल्ली सरकारने टाळे ठोकले आहे. दिल्ली सरकार प्रदूषण नियंत्रण कमी करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, दिल्लीला गॅस चेंबर बनवले गेले आहे, अशी घणाघाती टीका भाजप प्रवक्ते शेहजाद पुनावाला यांनी केली आहे.

 

हेही वाचा 

Back to top button