

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वयंपाक येत नाही म्हणून बायको जर नवऱ्यासाठी जेवण बनवू शकत नसेल, तर तो छळ म्हणता येणार नाही आणि या मुद्द्यावर घटस्फोट मागता येणार नाही, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अनिल नरेंद्र आणि सोफी थॉमस यांच्या पीठाने हा निर्णय दिला आहे. (Not Preparing Food is Not Cruelty)
या प्रकरणात नवऱ्याने छळाच्या मुद्द्यावर घटस्फोटाची मागणी केली होती. न्यायमूर्ती म्हणाले, "प्रतिवादी बायकोला जेवण बनवता येत नव्हते, त्यामुळे ती नवऱ्यासाठी जेवण बनवू शकत नव्हती. पण याला छळ म्हणता येणार नाही, त्यामुळे या मुद्द्यावर घटस्फोट देता येणार नाही." ही बातमी बार अँड बेंच या वेबसाईटने दिली आहे.
या प्रकरणातील जोडप्याचा विवाह ७ मे २०१२ला झाला होता आणि ते अबुधाबी येथे स्थायिक झाले होते. बायको सतत अवमान करते, नातवाईकांसमोर अपमानास्पद बोलते असा दावा नवऱ्याने केला होता. "तसेच मला कामावरून कमी केले जावे, यासाठी पत्नीने माझ्या कंपनीत पत्र लिहिले होते," असे ही नवऱ्याने याचिकेत म्हटले होते.
पत्नी जेवण बनवत नाही, आणि आईशी किरकोळ गोष्टींवरून वाद घालते, असेही याचिकेत नवऱ्याने म्हटले आहे.
बायकोने न्यायालयात हे सर्व आरोप फेटाळले, तसेच नवऱ्याला मानसिक आजार आहे असा दावा केला. तसेच कंपनीत जे पत्र पाठवले ते मदत मिळवण्याच्या हेतूने पाठवले होते असेही पत्नीने म्हटले.
उच्च न्यायालयाने म्हटले की, "नवऱ्याच्या वर्तणुकीत बदल झाल्याने बायकोने कंपनीत पत्र पाठवून विचारणा केली. नवऱ्याची वर्तणूक पूर्वीसारखी व्हावी असा तिचा हेतू होता." "घटस्फोटाला सबळ कारण नसेल तरकायद्याच्या भाषेत सांगायचे तर एखादा वादी लग्नातून स्वतःच्या इच्छेने बाहेर पडू शकत नाही," असे न्यायालयाने म्हटले आहे.
हेही वाचा