बंगळूर: वृत्तसंस्था; भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या सॉफ्टवेअरवर रोज शंभरहून अधिक सायबर हल्ले होतात हे खरे आहे. तथापि, आमची सायबर प्रणाली अभेद्य असल्यामुळे त्यात कोणालाच छेडछाड करता येणार नाही, असा निर्वाळा इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिला. केरळमधील कोची येथे दोनदिवसीय आंतरराष्ट्रीय सायबर परिषदेत ते बोलत होते. (ISRO News)
रॉकेट तंत्रज्ञानामध्ये सायबर हल्ल्याची शक्यता सर्वाधिक असते. कारण त्यामध्ये प्रगत सॉफ्टवेअर आणि चिप्सचा वापर केला जातो. हा धोका कितीही मोठा असला तरी अशा हल्ल्यांपासून इस्रो पूर्णपणे सुरक्षित आहे. काळानुसार तंत्रज्ञान बदलत असल्यामुळे आपल्यालाही तंत्रज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. सॉफ्टवेअरखेरीज रॉकेटमध्ये असलेल्या हार्डवेअर चिप्सच्या सुरक्षेवरही लक्ष केंद्रित केले जात असून त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यात येत आहेत.(ISRO News)
पूर्वी आम्ही उपग्रहांवर लक्ष ठेवण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करायचो. आता हेच काम अनेक उपग्रहांसाठी केले जात आहे. काळानुरूप तंत्रज्ञान बदलत असल्याचे यावरून दिसून येते. सर्वसामान्यांना दैनंदिन जीवनात मदत करणारे अनेक उपग्रह आहेत. हे उपग्रह विविध स्वरूपाच्या सॉफ्टवेअरद्वारे नियंत्रित केले जातात. त्यामुळे या घटकांचे रक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. (ISRO News)
प्रगत तंत्रज्ञान आपल्यासाठी वरदान आणि धोका असे दोन्ही असल्यामुळे त्याचा वापर करताना कमालीची दक्षता बाळगणे आवश्यक आहे. याकरिता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचा सामना करू शकतो. यासाठी अधिक चांगले संशोधन आणि कठोर परिश्रम करावे लागतील, अशी पुस्तीही इस्रो प्रमुखांनी जोडली.