कोटातील ‘त्‍या’ घटनांवर आनंद महिंद्रा व्‍यथित; विद्यार्थ्यांना म्‍हणाले, “तुमच्या इतका मी…” | पुढारी

कोटातील 'त्‍या' घटनांवर आनंद महिंद्रा व्‍यथित; विद्यार्थ्यांना म्‍हणाले, "तुमच्या इतका मी..."

पुढारी ऑनलाईन डेस्क: राजस्थानातील कोटा येथे यावर्षी अनेक विद्यार्थी आपलं जीवन संपवत आहेत. दोन दिवसांपूर्वी कोटा येथे महाराष्ट्रातील लातूरमधील एका विद्यार्थ्याने जीवन संपवले. या घटनांवर भारतातील प्रख्‍यात उद्योगपती आनंद महेंद्रा यांनी दु:ख व्यक्त करत, विद्यार्थ्यांना जीवनाचा कानमंत्र देखील दिला आहे. यासंदर्भातील पोस्ट त्‍यांनी त्यांच्या अधिकृत ‘X’ वरून ( पूर्वीचे ट्विट) (Anand mahindra) केली आहे.

दोन दिवसापूर्वी राजस्थानमधील कोटा येथे नीट परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याने कोचिंग इन्स्टि्टयूटच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारुन जीवन संपवले. हा विद्यार्थी महाराष्ट्रातील लातूर येथील रहिवाशी होता. तो कोटामध्ये नीट परीक्षेची तयारी करत (Anand mahindra) होता.

तुमचे ध्येय स्वतःला सिद्ध करणे नाही, तर स्वतःला शोधणे..

या घटनेनंतर आनंद महिंद्रा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राजस्थानातील कोटा येथील विद्यार्थ्यांच्या जीवन संपवण्याच्या घटनांनी तुमच्या इतकाच मी देखील दु:खी झालो आहे. अनेक उज्ज्वल भविष्य विझत असल्याचे पाहून दुःख होते. तुम्हाला
समजविण्यासाठी माझ्याकडे कोणतेही मोठे शहाणपण नाही; पण मी कोटातील प्रत्येक विद्यार्थ्याला सांगू इच्छितो की, जीवनाच्या या टप्प्यावर तुमचे ध्येय स्वतःला सिद्ध करणे नाही, तर स्वतःला शोधणे आहे, असा मोलाचा जीवनमंत्र आनंद महिंद्रा यांनी दिला आहे.

तुमच्यात सर्वोत्तम काय आहे ते शोधत राहा…

परीक्षा उत्तीर्ण न होणे हा आत्म-शोधाच्या प्रवासाचा एक भाग आहे. याचा अर्थ असा आहे की, तुमची खरी बुद्धिमत्ता कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे. तुमच्यातील सर्वोत्तम काय आहे ते तुम्ही शेवटी शोधून काढाल. यासाठी शोधत राहा, प्रवास करत रहा, असा मोलाचा सल्लाही देआनंद महिंद्रा यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे.

Anand mahindra: कोटाचे वास्तव

राजस्‍थानमधील कोटा शहरात बारावीनंतरच्‍या विविध प्रवेश परीक्षांसाठी १५० हून अधिक क्लासेस आहेत. देशभरातील जवळपास दोन लाख विद्यार्थी त्या क्लासेसमधून जेईई, नीटसह अन्य स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण घेत आहेत. दरवर्षी महाराष्ट्रातील सुमारे पाच हजार विद्यार्थी कोटा इथे दाखल होतात. या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी तिथे तीन हजार वसतिगृहे आणि जवळपास तितक्याच खानावळी आहेत. एका-एका विद्यार्थ्यामागे हे खासगी क्लासवाले वीस-वीस लाखांची फी आकारतात. यावर्षी म्‍हणजे जानेवारी २०२३ पासून काेटामध्‍ये विविध प्रवेश पात्रता परीक्षेची तयारी करणार्‍या २४ विद्यार्थ्यांनी आपले जीवन संपवले आहे. याची गंभीर दखल घेत राजस्‍थान सरकारने येथील क्‍लासेसमधील सर्व परीक्षा पुढील दाेन महिन्‍यांसाठी रद्द केल्‍या आहेत.

हेही वाचा :

Back to top button