Myanmar Nationals- हिंसाचारग्रस्‍त मणिपूरसमाेर नवे संकट! म्‍यानमारमधून ७०० हून अधिक जणांची घुसखोरी | पुढारी

Myanmar Nationals- हिंसाचारग्रस्‍त मणिपूरसमाेर नवे संकट! म्‍यानमारमधून ७०० हून अधिक जणांची घुसखोरी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील तीन महिन्‍यांहून अधिक काळ हिंसाचारात होरपळत असलेल्‍या मणिपूर राज्‍यावर आणखी एक संकट आले आहे. म्यानमारमधील ७०० हून अधिक नागरिकांनी मणिपूरमध्ये घुसखोरी केल्‍याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मणिपूर सरकारने आसाम रायफल्सकडून अहवाल मागितला आहे. . Myanmar Nationals-ृ

२३ जुलै रोजी  ७१८ हून अधिक म्‍यानमारमधील नागरिक भारत-म्यानमार सीमा ओलांडून चंदेल जिल्ह्यात दाखल झाले आहेत, अशी माहिती आसाम रायफल्सच्‍या वतीने चंदेल जिल्ह्याच्या उपायुक्तांना देण्‍यात आली होती. 22 ते 23 जुलै या दोन दिवसांत ३०१ मुलांसह ७१८ पेक्षा अधिक म्यानमार नागरिकांना योग्य प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश कसा दिला, याचा तपशीलवार अहवाल मणिपूर सरकारने मागवला आहे.

मणिपूरचे मुख्य सचिव विनीत जोशी यांनी सोमवारी रात्री उशिरा आसाम रायफल्सला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वैध व्हिसा/प्रवास कागदपत्रांशिवाय म्यानमारच्या नागरिकांचा मणिपूरमध्ये प्रवेश रोखण्यासाठी राज्य सरकारने सीमा सुरक्षा दलाला कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. ७१८ म्यानमार नागरिकांना चंदेल जिल्ह्यात योग्य प्रवासी कागदपत्रांशिवाय भारतात काेणत्‍या आधारावर  प्रवेश दिला, याची माहिती देण्‍यात यावी, असेही सरकारने म्‍हटले आहे. घुसखाेरी केलेल्‍या सर्व ७१८ बेकायदेशीर म्यानमार नागरिकांना तातडीने परत पाठवण्याचा सल्लाही विनीत जोशी यांनी दिला आहे.

Myanmar Nationals : मणिपूर पोलिसांकडून ‘फेक न्यूज’ प्रकरणी गुन्‍हा दाखल

मणिपूर पोलिसांनी सोमवारी एका “फेक न्यूज” प्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे. म्यानमारमध्ये सशस्त्र पुरुषांनी एका महिलेची हत्या केल्याचा व्हिडिओ या फेक न्‍यूजमध्‍ये दाखवला आहे. ही घटना मणिपूरमध्‍ये घडल्‍याचा दावा केला जात आहे. ही क्लिप दंगल भडकवण्यासाठी प्रसारित केली जात होती. खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ट्विट मणिपूर पोलिसांनी केले आहे.

मणिपूरमध्‍ये ४ मे रोजी महिलांवर झालेल्‍या अत्‍याचाराचा व्‍हिडिओ समोर आल्‍यानंतर मणिपूरमध्‍ये प्रचंड तणाव वाढला होता. या प्रकरणी मणिपूर पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. मेतेई समुदायाच्या अनुसूचित जमाती (एसटी) दर्जाच्या मागणीच्या निषेधार्थ राज्‍यात 3 मेपासून वांशिक हिंसाचार सुरू आहे. आतापर्यंत या हिंसाचारात  १६० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा : 

 

 

Back to top button