

तळागाळातील लोकांपर्यंत बँकींग व्यवस्था पोहोचावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली जनधन योजना अंमलात आणली होती. ताज्या आकडेवारीनुसार देशातील जनधन खात्यांची संख्या ४४ कोटींवर पोहोचली आहे. Jan dhan Bank Accounts
अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या योजनेमुळे कोट्यवधी लोक बँकींग व्यवस्थेशी जोडले गेले असल्याचे आर्थिक घडामोडीविषयक खात्याच्या सल्लागार मनिषा सेनशर्मा यांनी शुक्रवारी असोचॅकच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी जनधन योजनेची घोषणा केली होती. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात योजना अंमलात आली. जनधन योजनेमुळे शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब लोकांना बँकांत जमा पैसे जमा करणे – काढणे, कर्ज घेणे, विमा आणि पेन्शन योजनांचा लाभ घेणे सोपे झाले आहे.
डिजिटल इंडिया मोहिमेची व्याप्ती वाढविण्यास देखील सदर योजनेमुळे मदत झाली असल्याचे सेनशर्मा यांनी नमूद केले. ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारीनुसार आतापर्यंत ४४ कोटी लोकांनी जनधन योजनेअंतर्गत बँकखाती उघडली आहेत.
बँक खात्याशी आधार आणि मोबाईल क्रमांक जोडण्यात आल्याने गरीब वर्गाला सरकारी योजनांचा लाभ घेणे शक्य झाले आहे.
सरकारलाही लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा करता येत असल्याने मध्ये होणारी गळती थांबली असल्याचे सेनशर्मा यांनी सांगितले.