

देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स तसेच डिजिटल प्रसारमाध्यमांनी आझाद का महोत्सव ( 'Azadi ka Amrit Mahotsav' ) या लोगोचा अवलंब करावा, असे निर्देश केंद्र सरकारकडून बुधवारी देण्यात आले.
देशभक्तीची जाज्वल भावना आणि देशाचे विविध क्षेत्रातील यश जनतेपर्यंत पोहोचविण्यात खासगी प्रसारमाध्यमे मोलाची भूमिका बजावत असतात. चालूवर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत, याचे औचित्य साधत प्रसारमाध्यमांनी आझादी का अमृत महोत्सव लोगोचा वापर करावा, असे सरकारने निर्देशात म्हटले आहे.
देशाची समृध्द संस्कृती तसेच उज्जवल भविष्याप्रतीचा आशावाद, हा संदेश लोगोमुळे जनतेत जाईल, असेही सरकारने नमूद केले आहे. 12 मार्च रोजी आझादी का अमृत महोत्सव ( 'Azadi ka Amrit Mahotsav' ) कार्यक्रमास सुरुवात झाली होती. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत यानिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.