Heatwave | उष्माघात रोखण्यासाठी केंद्रीय पथक राज्यांत पाठवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती | पुढारी

Heatwave | उष्माघात रोखण्यासाठी केंद्रीय पथक राज्यांत पाठवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

पुढारी ऑनलाईन : देशभरातील उष्णतेच्या लाटेच्या (Heatwave) पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया (Union Health Minister Dr Mansukh Mandaviya)  यांच्या अध्यक्षतेखाली आज उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत सार्वजनिक आरोग्य यंत्रणा तयारीचा आढावा घेण्यात आला. ज्या राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे आणि उष्माघाताच्या घटना घडल्या आहेत, त्या राज्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, हवामान विभाग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले एक पथक पाठवले जाईल. हे पथक राज्य सरकारला मदत करेल, अशी माहिती मांडविया यांनी दिली.

उद्या मी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि ओडिशा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा, झारखंड आणि बिहार या पूर्वेकडील राज्यांच्या मंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहे. उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आयसीएमआरला (ICMR) सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

देशातील काही भागात मान्सून दाखल झाल्यानंतरही अनेक राज्ये अजूनही गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानाने त्रस्त आहेत. महाराष्ट्रातील विदर्भ, ओडिशा, झारखंड, बिहार, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात उष्णतेच्या लाटेने उष्माघाताचा धोका वाढला आहे.

पुढील दोन दिवसांत उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, विदर्भ, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यांतील काही भागात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Indian Meteorological Department) व्यक्त केली आहे. (Heatwave)

बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये उष्णतेने अनेकांचा बळी घेतला आहे. बिहारमधील गया येथे तापमानाचा पारा वाढल्याने सोमवारी दोघांना आपला जीव गमवावा लागला. बिहारमधील अनुग्रह नारायण मगध मेडिकल कॉलेजमध्ये दोघांचा मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशात तीव्र उष्णतेची लाट आहे. गेल्या रविवारच्या २४ तासांत बलिया जिल्हा रुग्णालयात १४ नवीन मृत्यू आणि १७८ रुग्ण दाखल झाल्याची नोंद झाली आहे. १५ जून ते १८ जून या चार दिवसांत उष्माघाताने येथील मृतांची संख्या ६८ वर पोहोचली आहे. राज्य सरकार उष्माघाताच्या मृत्यूच्या वाढीचा तपास करत आहे.

१५ जून रोजी सुमारे १५४ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २३ जणांचा मृत्यू झाला. १६ जून रोजी १३७ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि २० जणांचा मृत्यू झाला. १७ जून रोजी रुग्णालयात ११ मृत्यूची नोंद झाली आणि १८ जून रोजी १७८ रुग्णांना दाखल करण्यात आले आणि १४ मृत्यूची नोंद झाली होती.

हे ही वाचा :

Back to top button