

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूर सरकारच्या माहितीनुसार, इंफाळमधील कोंगबा येथे केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आरके रंजन सिंह यांच्या निवासस्थानावर जमावाने कथितपणे आग लावली, ही आग गुरुवारी (दि.१५) रात्री उशिरा लावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (Manipur) सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. पण घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर नुकसान झाले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना आरके रंजन सिंह म्हणाले, "मी सध्या अधिकृत कामासाठी केरळमध्ये आहे. सुदैवाने, काल रात्री १० च्या सुमारास माझ्या इम्फाळच्या घरी जवळपास ५० लोकांनी आग लावली. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. काही लोक पेट्रोल बॉम्ब घेऊन आले आणि टाकले. माझ्या घराच्या तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर नुकसान झाले आहे. जे लोक या हिंसाचारात गुंतले आहेत ते देशाचे खूप मोठे नुकसान करत आहेत. हिंसाचार करणारे मानवतेचे शत्रू आहेत.
ईशान्येकडील राज्यात शांतता राखण्याचे आवाहन करताना ते म्हणाले, "माझ्या गृहराज्यात जे घडत आहे ते पाहून खूप वाईट वाटते. मी अजूनही शांततेचे आवाहन करत राहीन. अशा प्रकारचा हिंसाचार करणारे हे पूर्णपणे अमानवी आहेत."
हेही वाचा