आयआयटी प्रवेशासाठी बारावीत ७५ टक्के गुण प्राप्त करण्याची असलेली अट हटविण्याच्या विनंतीची याचिका फेटाळली
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : इंडियन इनि्स्टट्यूट ऑफ टेक्नालॉजी अर्थात आयआयटी महाविद्यालयांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना बारावीत ७५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असते. ही अट हटविण्यात यावी, अशा विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज ( दि. २९) फेटाळून लावली.
हा शैक्षणिक विषय असून त्यावर शिक्षण तज्ज्ञांनी विचार करणे आवश्यक आहे, असे सांगत सुटीकालीन न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधांशू धुलिया आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली. आयआयटीमध्ये प्रवेशासाठी बारावीला ७५ टक्के गुण असणे गरजेचे आहे, ही अट आधीपासून आहे. त्यात आताच हस्तक्षेप करण्याची गरज का आहे, असा सवालही खंडपीठाने याचिकाकर्ते चंदन कुमार यांना विचारला.
एका विद्यार्थिनीला जेईई मेन्स परिक्षेत ९८ टक्के गुण प्राप्त झालेले आहेत; पण बारावीत तिला ७५ टक्क्यांपेक्षा कमी गुण आहेत. असेच काहीसे अन्य विद्यार्थ्यांच्या बाबतीत आहे, त्यांना जेईई मेन्स परिक्षेत अतिशय चांगले गुण आहेत व जेईई अॅडव्हान्ससाठी ते पात्र आहेत. तरीही बारावीतील गुणांच्या निकषामुळे त्यांना ‘आयआयटी’मध्ये प्रवेश मिळू शकत नाही. अशा सि्थतीत ही अट रद्द केली जावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती.
हेही वाचा :
- Rolls Royce : विमान खरेदीतील भ्रष्टाचार प्रकरणी रॉल्स रॉयस कंपनीसह संचालकावर गुन्हा दाखल
- Yasin Malik : एनआयएच्या याचिकेची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाची यासिन मलिकला नोटीस
- महाराष्ट्र सदनातून सावित्रीबाईं फुले आणि अहिल्याबाई होळकरांचा पुतळा हटवणे चिंतेची बाब : जयंत पाटील