Manipur Violence : मणिपूरमध्ये आदिवासी आंदोलनादरम्यान हिंसाचार; ८ जिल्ह्यात संचारबंदी, मोबाईल इंटरनेट सेवा बंद
पुढारी ऑनलाईन: मणिपूरमध्ये, मेईतेई/मीतेईचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीच्या निषेधार्थ बुधवारी (दि.३) ऑल ट्रायबल्स स्टुडंट्स युनियनच्या (एटीएसयू) वतीने मोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी लोक सहभागी होते. दरम्यान, मोर्चात सहभागी आंदोलकांमध्येच अचानक हिंसाचार उसळला. या दरम्यान चुराचांदपूर येथे तणावाचे वातावरण असताना जमावाने घरांची तोडफोड आणि जाळपोळ (Manipur Violence) केली. दरम्यान, पोलिस दलाच्या तत्पर्तेमुळे कोणतेही मोठे नुकसान झाले नसल्याचे येथील पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
आंदोलनात अचानक उसळलेल्या हिंसाचारानंतर येथील परिस्थिती अटोक्यात आणण्यात पोलिसांना यश आले आहे. येथील परिस्थिती लष्कराचे जवान राज्यातील विविध भागात फ्लॅग मार्च काढत आहेत. मणिपूर नागरी प्रशासनाच्या आवाहनावरून लष्कराला विविध भागात तैनात करण्यात आल्याची माहिती लष्कराने दिली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव मणिपूरमधील ८ जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून, संपूर्ण राज्यात मोबाईल इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी बंद (Manipur Violence) करण्यात आल्याचे येथील सरकारने सांगितल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
Internet services suspended in Manipur for five days amid incidents of fighting amongst youths, volunteers of different communities as a rally was organised by All Tribals Students Union (ATSU) Manipur in protest against the demand for inclusion of Meitei/Meetei in the ST… pic.twitter.com/BVyD78JPhV
— ANI (@ANI) May 3, 2023
Manipur Violence: पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
या रॅलीत हजारो आंदोलक सहभागी झाले होते. मणिपूरमधील टोरबांग भागात आदिवासी आणि गैरआदिवासी यांच्यात हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. तसेच जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतर परिस्थिती तणावपूर्ण राहिली असली तरी, अनेक आंदोलकांना पांगवण्यात तसेच आपल्या घरी परतवण्यात पोलिस यंत्रणांना यश आले आहे.
पाच दिवस मोबाइल इंटरनेट बंद
मणिपूरमधील काही जिल्हयातील परिस्थिती पाहता, बिगर आदिवासीबहुल इम्फाळ पश्चिम, काकचिंग, थौबल, जिरीबाम आणि बिष्णुपूर हे जिल्हे आणि आदिवासी बहुल चुराचांदपूर, कांगपोकपी आणि तेंगनौपाल जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, राज्यभरातील मोबाईल इंटरनेट सेवा पाच दिवसांसाठी तात्काळ बंद करण्यात आली असली असून, ब्रॉडबँड सेवा सुरू आहेत. आठ जिल्ह्यांच्या प्रशासनाकडून कर्फ्यू लागू करण्याबाबत स्वतंत्र आदेश जारी करण्यात आले आहेत, असे मणिपूर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.