बंगळुरु; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक निवडणुकीचा ज्वर हळूहळू चढू लागला आहे. प्रचारातील राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपाने वातावरण ऐनं उन्हाळ्यात तापू लागले आहे. १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचा प्रचार जोराने सुरु आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील कालाबुरागी येथील प्रचार सभेत बोलताना काँग्रेस अध्यक्ष व ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. आपल्या प्रचार भाषणात खरगे यांनी पंतप्रधान मोदी यांना विषारी साप असल्याचे म्हणाले. या टीकेनंतर राजकीय वातावरण भलतेच तंग झाले आणि भाजपच्या नेत्यांनी खरगे यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. (Poisonous Snake Row)
एएनआय या न्यूज एजन्सीच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरुन खरगे यांच्या भाषणाचा व्हिडिओ पोष्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन खरगे स्थानिक भाषेत अर्थात कन्नडमध्ये बोलताना म्हणाले,' पंतप्रधान मोदी हे विषारी सापा प्रमाणे आहेत, तुम्ही विचार कराला की हे विष आहे की नाही, जर तुम्ही ते चाखाल तर तुमचा मृत्यू होईल'. (Poisonous Snake Row)
खरगे यांच्या पंतप्रधानांवर केलेल्या टीकेनंतर एकूणच राजकीय वातावरण ढवळून निघाले. सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर तुटन पडले आणि त्यांच्यावर खरपूस टीका केली. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, 'वारंवार निवडणुकीतील पराभव आणि रोष हा कुठेतरी मोदीजींचा अपमान करणे, त्यांना शिव्या देणे ही काँग्रेसची हतबला बनत चालली आहे. सोनिया गांधींपासून ते त्यांच्या अध्यक्षांपर्यंत मोदीजींना 'कधी मृत्यूचे व्यापारी' म्हटले जाते, तर कधी 'विंचू' म्हटले जाते, आता त्यांनी मोदीजींना सापाची उपमा दिली आहे. या आक्षेपार्ह विधानाबद्दल काँग्रेसला देशाची माफी मागावी लागेल, नाहीतर कर्नाटकची जनता माफ करणार नाही. तसेच या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिटसुद्धा जप्त होईल.
दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, "खरगेजींच्या मनात विष आहे. ते पंतप्रधान मोदी आणि भाजपबाबत पूर्वग्रहदूषित आहेत. नैराशेतून अशा प्रकारचे विचार येतात कारण ते राजकीयदृष्ट्या आमच्याशी लढू शकत नाहीत. त्यांना माहित आहे की त्यांचे जहाज बुडत आहे." केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह केंद्रीय मंत्री धमेंद्र प्रधान, स्मृती ईरानी यांनी सुद्धा खरगे यांच्यावर टीका केली आहे.
खरगे यांचे घूमजाव
पंतप्रधानांना साप म्हटल्यानंतर संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे हे टीकेचे धनी बनले. अनेक स्तरातून खरगे यांच्यावर टीका झाली. यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या विधानावर स्पष्टीकरण देत ट्वीटरवर अनेक ट्वीट करत आपल्या विधानाबाबत सारवासारव केली. ट्वीटद्वारे खरगे म्हणाले, '
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आमचे कोणतेही वैयक्तिक मतभेद नाही त्यांच्याशी आमची वैचारिक लढाई आहे. मी पंतप्रधान मोदी आणि आरएसएसच्या विचारसरणीबद्दल बोललो होतो. माझा दृष्टिकोन त्यांच्या विचारसरणीबद्दल आहे. मी कोणावर वैयक्तिक हल्ला केलेला नाही.
अधिक वाचा :