नोकरशाहीने एक चूक केली तर देशाचा पैसा लुटला जाईल : पंतप्रधान मोदी | पुढारी

नोकरशाहीने एक चूक केली तर देशाचा पैसा लुटला जाईल : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  नोकरशाहीकडून चूक झाली तर देशाचा संपूर्ण पैसा लुटला जाईल. त्यामुळेच सेवेत कार्यरत असताना तुमच्या निर्णयांचा आधार केवळ देशहित असला पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले.

ते म्हणाले, सत्तेत आलेल्या राजकीय पक्षांवर लक्ष ठेवा. हे पक्ष करदात्यांच्या पैशाचा वापर स्वतःच्या पक्षासाठी करत आहे की देशहितासाठी हे तुम्हाला पाहावे लागेल. देशाने तुमच्यावर विश्वास टाकून तुम्हाला खूप मोठी संधी दिली आहे. हा विश्वास सार्थ ठरवा.
सरकारच सर्व काही करेल असा पूर्वी विचार होता. पण आता सरकार सर्वांसाठी करेल असा विचार आहे. आता सरकार वेळ व संसाधनांचा कार्यक्षम वापर करत आहे. विद्यमान सरकारचे ध्येय प्रथम देश व नागरिक असून, प्राधान्य वंचितांना आहे.

आधीच्या सरकारच्या काळात 4 कोटींहून अधिक बोगस गॅस कनेक्शन आणि नकली रेशन कार्ड तयार झाले होते. अल्पसंख्याक मंत्रालय 30 लाखांहून अधिक बोगस तरुणांना शिष्यवृत्तीचा लाभ देत होते.

आज आपण सर्वांच्या प्रयत्नाने ती व्यवस्था बदलली आहे. देशातील जवळपास तीन लाख कोटी रुपये चुकीच्या हातात जाण्यापासून वाचले आहेत. आता हा पैसा थेट गरिबांच्या हातात जात आहे. कारण मध्यस्थांची साखळीच उद्ध्वस्त करण्यात आली आहे.

Back to top button