Vande Bharat Express:पीएम मोदींच्या हस्ते राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा | पुढारी

Vande Bharat Express:पीएम मोदींच्या हस्ते राजस्थानमधील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा

पुढारी ऑनलाईन: राजस्थानमध्ये सुरू होत असलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे येथील पर्यटनाला मोठी मदत होणार आहे. यामुळे पर्यटन उद्योगालाही चालना मिळणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.१२) राजस्थानातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा दाखवला. पीएम मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राजस्थानातील या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्धाटन केले.

यावेळी बोलताना पीएम मोदी म्हणाले,  गेल्या दोन महिन्यांत आज सहाव्या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला, हे माझे भाग्य आहे. वंदे भारत एक्सप्रेसचा विकास आणि गुणवत्ता पाहता वंदे भारत ट्रेनचे आज देशभरात कौतुक होत आहे. वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासून सुमारे ६० लाख लोकांनी या गाड्यांमधून प्रवास केला आहे. हायस्पीड वंदे भारतचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते लोकांचा वेळ वाचवत आहे. जलद गतीपासून ते सुंदर डिझाइनपर्यंत वंदे भारत एक्सप्रेस अनेक वैशिष्ट्यांनी संपन्न आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पर्यटन स्थळांची कनेक्टिव्हिटी सुधारेल-पीएम मोदी

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी देशातील विविध मार्गांवर केंद्र सरकारकडून वंदे भारत एक्स्प्रेस सेवा सुरू करण्यात येत आहे. ही ट्रेन जयपूर ते दिल्ली या मार्गावर सेवा देणार आहे. या एक्सप्रेसची सेवा आठवड्यातून ६ दिवस सुरू असणार आहे. अजमेर-दिल्ली कॅन्टोन्मेंट मार्गावर धावणारी ही ट्रेन राजस्थानमधील प्रमुख पर्यटन स्थळांची कनेक्टिव्हिटी सुधारण्यास मदत करण्यात येणार आहे. जयपूर, अलवर आणि गुडगाव येथे या रेल्वेचे थांबे असतील. राजस्थानमधील पहिली वंदे भारत एक्सप्रेस जयपूर ते दिल्ली मार्गावर धावणार आहे. या रेल्वेची नियमित सेवा १३ एप्रिलपासून सुरू होणार आहे, असे भारतीय रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आजची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ उद्याचा विकसित भारत

वंदे भारत एक्सप्रेस ‘इंडिया फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट’ या भावनेला समृद्ध करते. वंदे भारत ट्रेन आज विकास, आधुनिकता, स्वावलंबन आणि स्थिरता यांचा समानार्थी शब्द बनली आहे, याचा मला आनंद आहे. वंदे भारताचा आजचा प्रवास आपल्याला उद्याच्या विकसित भारताच्या प्रवासाकडे घेऊन जाईल.

२०१४ नंतर रेल्वे विकासात क्रांतिकारी परिवर्तन

स्वातंत्र्यानंतर, रेल्वेच्या आधुनिकीकरणावर नेहमीच राजकीय हितसंबंधांचे वर्चस्व राहिले आहे. रेल्वेमंत्री कोण होणार हे राजकीय स्वार्थ पाहूनच ठरले जात होते. त्यामुळे २०१४ पूर्वी सरकारने ज्या कधी धावल्याच नाहीत, अशा रेल्वे गाड्या जाहीर केल्या. अशी टिका देखील काँग्रेस सरकारवर केली आहे. त्यावेळी परिस्थिती अशी होती की, गरिबांच्या जमिनी हिसकावून त्यांना रेल्वेत नोकरी दिली जात होती. तेव्हा रेल्वेची सुरक्षा आणि स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. मात्र या सर्व व्यवस्थेत २०१४ नंतर बदल झाल्याचे देखील पीएम मोदी म्हणाले.

दुर्दैवाने, रेल्वेच्या आधुनिकीकरणावर नेहमीच स्वार्थी आणि मतलबी राजकारणाची छाप पडली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या भ्रष्टाचाराने ना रेल्वेचा विकास होऊ दिला, ना रेल्वेची निवड प्रक्रिया पारदर्शक होऊ दिली. २०१४ नंतर मात्र रेल्वे विकासात क्रांतिकारी परिवर्तन घडू लागले असल्याचे देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा:

Back to top button