

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्तीवर झालेल्या हल्ला प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घेतला जावा अथवा त्यांना पदावरुन हटविले जावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली आहे. (Priyanka Chaturvedi )
ठाण्यातील प्रकरणाच्या अनुषंगाने राज्याच्या गृह मंत्र्याच्या भूमिकेबाबत अहवाल मागविण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील संस्कार आणि संस्कृती कधीही महिलांवरील अशा मारहाणीचे प्रकार सहन करणार नाही. या प्रकरणात संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही आपण अमित शहा यांच्याकडे केली आहे, असे चतुर्वेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे सोडून पोलिस पीडित महिलेलाच प्रताडित करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
स्थिती हाताळण्यात राज्याचे गृहमंत्री अपयशी ठरले असून सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्य सरकारला फटकारले आहे. संभाजीनगर दंगलीत कशी हिंसा झाली, हे सर्वांनी पाहिले आहे.रोशनी शिंदे प्रकरणी पोलिसांनी त्यांचे काम केले पाहिजे. त्यांच्यावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये, अशी आमची भूमिका आहे. राज्याचे गृहमंत्री प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत, त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. त्यांना पदावरुन हटविणे, त्यांचा राजीनामा घेणे हे सध्याच्या परिस्थितीत योग्य ठरणार आहे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.