पुढारी ऑनलाईन: जुनी पेन्शन पुन्हा सुरू करण्यासाठी गेले सात दिवसांपासून सुरू असलेला सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर आज (दि.20) मागे घेण्यात आला. राज्य सरकारसोबत बैठक पार पडल्यानंतर हा संप मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय कर्मचारी संघटनेने घेतला. सरकारने तीन महिन्यांमध्ये या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे, असेही कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे.
गेले सात दिवसांपासून जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू होते. सरकारी कर्मचारी आंदोलनात सहभागी असल्याने सरकारी कार्यालयात शुकशुकाट होता. तसेच अनेक कामे रखडली होती. आरोग्यव्यवस्था देखील कोलमंडली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. झालेली बैठक यशस्वी झाल्यानंतर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच उद्यापासून (दि.२१) सर्व कर्मचारी कामावर हजर राहणार असल्याची माहिती संघटनेचे विश्वास काटकर यांनी माध्यमांना दिली आहे.