देशात नाफेडकडून ४ हजार मॅट्रिक टन कांदा खरेदी
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघाने (नाफेड) गेल्या ११ दिवसांमध्ये शेतकऱ्यांकडून ९०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे ४ हजार मॅट्रिक टन कांदा खरेदी केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. देशभरात नाफेडने ४० खरेदी केंद्र उघडली असून तिथे शेतकरी त्यांचा कांदासाठा विकू शकतात. नाफेडच्या खरेदी केंद्रांवरुन दिल्ली, कोलकाता, गुवाहाटी, भुवनेश्वर, बंगळुरू, चेन्नई, हैद्राबाद तसेच कोची येथे हा कांदासाठा नेण्याची व्यवस्था केली जाईल.
२०२२-२३ मध्ये कांद्याचे अंदाजे उत्पादन ३१८ लाख मेट्रिक टन एवढे आहे. गतवर्षी हे उत्पादन ३१६.९८ लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त आहे. मागणी आणि पुरवठा तसेच निर्यात क्षमतेमुळे किंमत स्थिर राहील्या. देशातील इतर राज्यांमध्ये कांद्याचे उत्पादन वाढल्यामुळे तसेच देशातील प्रमुख उत्पादक जिल्ह्यांतील नाशिकमधील पुरवठ्यावरील अवलंबित्व कमी झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याचे दर घसरले आहे, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
देशातील कांद्याच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचा ४३ टक्के वाटा असतो. महाराष्ट्रानंतर मध्यप्रदेश १६ टक्के आणि गुजरातमध्ये ९ टक्के कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी नाफेडच्या ग्राहक व्यवहार विभागाने २.५ लाख मेट्रिक टन अतिरिक्त कांदा साठा ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सरकारने दिली आहे.
हेही वाचा :