नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: ब्राम्हण समाज हा मागणी करीत नाही, तर ब्राम्हणांनी नेहेमीच समाजाला दिलेले आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतील चाणक्यपुरीमध्ये आयोजित ब्रह्मोद्योग परिषदेत बोलताना केले. ब्राम्हण समाजातील उद्योजक, कायदेतज्ज्ञ, वैद्यक व्यावसायिक तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी तीन दिवशीय ब्रह्मोद्योग परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याच्या उद्घाटनावेळी फडणवीस बोलत होते.
ब्राम्हण समाजातील विविध व्यावसायिक घटकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगl, फडणवीस म्हणाले, ब्राम्हण समाजाचा कार्यक्रम नेहमी योग्य ठिकाणी होतो. दिल्लीतील चाणक्यपुरीच्या नीती मार्गावर हा कार्यक्रम होत आहे. नीतीने चालणे, समाजातील सर्व घटकांशी सौदार्हपूर्ण संबंध ठेवणे आणि चाणक्याच्या बुध्दीने काम करणे हे ब्राम्हणांचे तिन्ही गुण याठिकाणी एकत्र आले आहेत. खूप योग्यवेळी हा कार्यक्रम होत आहे.
ब्राम्हणांच्या वेगवेगळ्या संघटनांच्या कार्यक्रमांना आपण गेलेलो आहेत. या सर्व कार्यक्रमात कोणीही मागणी करत नाही तर ब्राम्हणांनी नेहेमीच समाजाला दिलेले आहे. आजही देण्याची परंपरा कायम ठेवणे आणि येणाऱ्या पिढ्यांना मागणारे बनविण्याऐवजी देणरे कसे बनवायचे, यासाठी प्रशिक्षित करणे हीच या ब्रह्मोद्योगाकडून अपेक्षा आहे.
संख्येने ब्राम्हण कमी असतील पण ब्राम्हणांमध्ये एक शक्ती आहे. समाजरूपी दुधात ब्राम्हण साखरेचे काम करतो आणि समाजातला गोडवा वाढवितो. आपले ज्ञान, परंपरा येणाऱ्या पिढ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे हाही महत्वाचा मुद्दा आहे. आपल्या शास्त्रांनी आपल्याला वेळेनुसार बदलायलाही शिकवलेले आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.