Pakistan Economic Crisis : दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्तानला हवेत ‘मनमोहन सिंग’, भारताचे केले कौतुक | पुढारी

Pakistan Economic Crisis : दिवाळखोरीत निघालेल्या पाकिस्तानला हवेत 'मनमोहन सिंग', भारताचे केले कौतुक

पुढारी ऑनलाईन : नव्वदच्या शतकात जेव्हा भारत आर्थिक परिस्थितीचा सामना करत होता, तेव्हा भारतातील तेव्हाच्या सरकारने आर्थिक सल्लागार म्हणून, डॉ. मनमोहनसिंग सिंग यांची निवड केली होती. तेव्हाच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे पाकिस्तानी-अमेरिकन आर्थिकतज्ज्ञ आणि प्रिन्स्टन विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक आतिफ मियाँ यांनी भरभरून कौतुक केले आहे. मियाँ यांनी पाकिस्तानला सध्याच्या परिस्थितीत भारताकडून शिकण्याचा सल्ला दिला आहे. यावेळी त्यांनी भारताचे कौतुक करत पाकिस्तानातील दिवाळखोरी (Pakistan Economic Crisis) टाळण्यासाठी भारताप्रमाणेच पात्र लोकांची नियुक्ती करावी, असा सल्ला देखील येथील सरकारला दिला आहे.

पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाच्या (Pakistan Economic Crisis) गर्तेत अडकला आहे. पाकिस्तानवरील आर्थिक संकट दिवसेंदिवस वाढत आहे. IMF कडून देखील अद्याप कोणत्याही मदतीची शक्यता दिसत नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान जरी मित्र देशांकडून कर्ज मागत असले तरी त्यांना माहित आहे की, ‘कर्ज’ हे काही आर्थिक संकटावरचा उपाय नाही, हे त्यांनी स्वत: देखील मान्य केले आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तान आर्थिक अडचणीतून कसा बाहेर येईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाकिस्तानच्या या स्थितीवर अनेक तज्ज्ञांचे मत देखील घेतले जात आहे.

काही दशकांपूर्वी म्हणजे १९९० च्या दशकात भारतदेखील अशाच संकटाचा सामना करत होता. तेव्हाच्या काळात भारताने घेतलेल्या निर्णयांबद्दल तज्ज्ञांनी भारताचे कौतुक केले आहे. प्रिन्स्टन विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक आतिफ मियाँ यांनी ब्रुकिंग्स संस्थेतील एका पॅनेल चर्चेत सांगितले की, “राजकीय नेतृत्वाचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे महत्त्वाच्या समस्या हाताळण्यासाठी पात्र लोक आणि त्यांची टिम नियुक्त करणे खूप महत्त्वाचे आहे.” पाकिस्तानची सध्याच्या परिस्थिती आणि गंभीर आर्थिक संकटाला (Pakistan Economic Crisis)  अर्थमंत्री इशाक दार हे जबाबदार असल्याने त्यांच्यावर देशभर टीका केली जात आहे.

Pakistan Economic Crisis: डॉ. मनमोहन सिंग यांचे उदाहरण देत भारताचे कौतुक

1990 च्या दशकात भारताला देखील अशाच आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. त्यावेळच्या परिस्थितीत भारताने सक्षम लोकांची नियुक्ती केल्याबद्दल मियाँ यांनी भारताचे कौतुक केले आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, 1990 च्या दशकात भारत सरकारला देशाचा कायापालट करण्यासाठी सक्षम लोकांची गरज असल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी मनमोहन सिंग यांच्यासारख्या अत्यंत कार्यक्षम आणि आदरणीय व्यक्तीची नियुक्ती केली. ते कोणत्या जाती धर्माचे आहेत, याची पर्वा न करता भारताने मनमोहन सिंग यांची आर्थिक सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केली. याबद्दल त्यांनी भारताचे कौतुक केले आहे.

Pakistan Economic Crisis : कुटुंबाने देश चालत नाही

पाकिस्तानचे माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांच्याशी चर्चा करताना अर्थतज्ज्ञ आतिफ मियाँ म्हणाले, “देशातील आर्थिक निर्णय घेताना जर तुम्ही गुणवत्तेपेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिले. देशातील महत्त्वाच्या पदांवर तुमचा भाऊ, मेहुणा, मुलगी आणि पुतण्यांना नियुक्त केले. तर 22 कोटी लोकांचा देश तुम्ही चालवू शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतिफ मियाँ यांनी पाकिस्तानातील सध्याच्या आर्थिक संकटासाठी मागील इम्रान सरकारवर राग व्यक्त करत, त्यांच्या धोरणांवर देखील तीव्र टीका केली. दरम्यान भारताने अशा आर्थिक संकटात घेतलेल्या निर्णयांसाठी भारताचे जोरदार कौतुक देखील केले आहे.

हेही वाचा:

Back to top button