कन्याकुमारीत बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारा; आरपीआयची मागणी | पुढारी

कन्याकुमारीत बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारा; आरपीआयची मागणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीपित्यर्थ कन्याकुमारीत चारशे फुट उंच स्मारक उभारा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने सोमवारी (दि.१९) केली. कॉन्स्टिट्युशन क्लब येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. यावेळी रामदास आठवले यांनी या स्मारकाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.

पक्ष संघटना बळकट करण्यासाठी येत्या काही वर्षात व्यापक सदस्यता मोहिम राबवून पाच कोटी सदस्य बनवण्याचे लक्ष पक्षाने ठेवले असल्याची घोषणा देखील रामदास आठवले यांनी केली आहे. यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच भूमिहीन कुटुंबियांना ५ एकर जमीन देण्याची मागणी देखील आठवले यांनी यावेळी केली. यासंदर्भात पक्षाच्या ‘राज्य युनिट’च्या वतीने लवकरच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पदोन्नतीत आरक्षणासाठी केंद्र सरकारने तात्काळ कायदा बनवण्याची मागणी देखील पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

पुढील वर्षात होऊ घातलेल्या त्रिपुरा, मेघालय, नागालँड,राजस्थान तसेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आरपीआय भाजप सोबत युती करणार असून लवकरच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,भाजप संघटन महासचिव बी.एल.संतोष यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button