Assam-Meghalaya Border : आसाम-मेघालय सीमेवर वनविभागाच्या गोळीबारानंतर हिंसाचार : ६ ठार | पुढारी

Assam-Meghalaya Border : आसाम-मेघालय सीमेवर वनविभागाच्या गोळीबारानंतर हिंसाचार : ६ ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाम-मेघालय सीमेवर (Assam-Meghalaya Border) मंगळवारी ( दि. २२) सकाळी वनविभागाने लाकूड तस्करी करण्याच्या संशयावरून ट्रकवर गोळीबार केला. या घटनेनंतर उसळलेल्या हिंसाचारात वनरक्षकासह ६ जणांचा मृत्यू झाला. वनविभागाने लाकूड तस्करी करणाऱ्या ट्रकला थांबविल्यानंतर जमाव आणि वनविभाग आणि पोलिसांत हाणामारी झाली. यात वनरक्षकासह ६ जण ठार झाले. या घटनेनंतर मेघालय सरकारने ७ जिल्ह्यांतील मोबाईल इंटरनेट सेवा पुढील ४८ तासांसाठी बंद केली आहे.

या घटनेनंतर (Assam-Meghalaya Border) मेघालयातील पश्चिम जयंतिया हिल्स, पूर्व जयंतिया हिल्स, पूर्व खासी हिल्स, री-भोई, पूर्व पश्चिम खासी हिल्स, पश्चिम खासी हिल्स आणि दक्षिण पश्चिम खासी हिल्समध्ये इंटरनेट बंद करण्यात आले आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांनी सांगितले की, या घटनेत मेघालयातील ५ आणि आसाममधील एका वनरक्षकासह एकूण ६ जणांचा मृत्यू झाला. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.

कॉनराड संगमा म्हणाले की, मेघालय पोलिसांच्या वतीने एफआयआर नोंदवून तपास करण्यात येत आहे. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. मी या घटनेबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो असून त्यांनी सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

पश्चिम कार्बी आंगलाँगचे पोलीस अधीक्षक इमदाद अली यांनी पीटीआयला सांगितले की, आसाम वनविभागाच्या पथकाने पहाटे तीनच्या सुमारास मेघालय सीमेवर लाकूड घेऊन जाणारा ट्रक अडवला. परंतु ट्रक थांबला नाही. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी गोळीबार करून ट्रकचे टायर पंक्चर केले. चालक, त्याचा एक साथीदार आणि अन्य एका व्यक्तीला पकडण्यात आले. तर अन्य एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला. वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी या घटनेची माहिती जिरिकेंडिंग पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

यावेळी घटनास्थळी अटक केलेल्या लोकांना सोडण्याची मागणी जमावाने केली. जमावाने वन विभागाचे कर्मचारी आणि पोलिसांना घेराव घातल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांना गोळीबार करावा लागला. या घटनेत वनविभागाच्या एका होमगार्डचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. परिस्थिती आता नियंत्रणात आहे. वन कर्मचारी विद्यासिंग लेखे यांचा मृत्यू कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Assam-Meghalaya Border  दोन्ही राज्यांमध्ये करार झाला

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्यात मार्चमध्ये झालेल्या करारानंतर हा हिंसाचार झाला आहे. त्यानंतर दोन्ही राज्यांमधील ८८४.९ किमी लांबीच्या सीमेवरील १२ पैकी ६ विवादित क्षेत्रांमधील ५० वर्षापूर्वीचा जुना वाद सोडवण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांमध्ये करार करण्यात आला. त्यानंतर ७० टक्के वाद मिटण्याची शक्यता बळावली होती. उर्वरित भागातील वाद सोडवण्यासाठी सरमा आणि संगमा यांनी ऑगस्टमध्ये चर्चा केली.

.

 

हेही वाचलंत का ? 

Back to top button