नितीन गडकरी : ‘आमदार दुःखी, मंत्री दुःखी, मुख्यमंत्रीदेखील दुःखी’ | पुढारी

नितीन गडकरी : 'आमदार दुःखी, मंत्री दुःखी, मुख्यमंत्रीदेखील दुःखी'

जयपूर; पुढारी वृत्तसेवा : भाजप अध्यक्ष असताना मला असा एकही भेटला नाही जो दुः खी नाही. प्रत्येकजण दुःखी आहे. आमदार दुःखी आहेत. कारण त्यांना मंत्रिपद मिळालेले नाही. मंत्री दुःखी आहेत. कारण त्यांना चांगले मंत्रालय किंवा मुख्यमंत्रिपद मिळाले नाही आणि मुख्यमंत्री दुःखी आहेत. कारण पद किती काळ राहील माहीत नाही, अशी मिश्कील टिप्पणी सोमवारी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

राजस्थान विधानसभेत संसदीय लोकशाही आणि लोकांचा अपेक्षा या विषयावरील सेमिनारमध्ये ते बोलत होते. नितीन गडकरी म्हणाले की, व्यंगकार शरद जोशी यांनी लिहिले होते की, राज्यांत जे कामाचे नव्हते त्यांना दिल्लीला पाठवले गेले. जे दिल्लीत कामाचे नव्हते त्यांना राज्यपाल केले गेले. जे तिथेही कामाचे नाहीत, त्यांना राजदूत केले गेले. मी मात्र मजेत राहतो. कारण मी भविष्याची चिंता करत नाही.

वन डे क्रिकेट प्रमाणे खेळत राहा. मी सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर यांना विचारले की ते चौकार, षटकार कसे ठोकतात. त्यावर ते म्हणले की, ते एक कौशल्य आहे. याचप्रकारे राजकारण हे देखील एक कौशल्य आहे, असे गडकरी यांनी सूचवले.

हे ही वाचलं का?

Back to top button