

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : जालना येथील 'मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क' उभारण्यासाठी आज नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. हा प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाची गती वाढण्यास महत्वाचा ठरेल,असा विश्वास मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. या महत्वाकांक्षी प्रकल्पाद्वारे राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आणि जलमार्गाच्या माध्यमातून शेती व उद्योजकांच्या मालाची सुकर व गतीने निर्यात होण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले.
फळ, भाजीपाला, कापूस, ऊस, दुध उत्पादनासह मराठवाडयातील ऑटोमोबाईल उद्योगाच्या विकासासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरेल. निर्यात वाढल्यास उद्योग वाढेल पर्यायाने रोजगार निर्मिती होईल आणि जनतेसाठी विकास नवे दालनच उघडे होईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
गडकरी यांच्या निवासस्थानी केंद्रीय बंदरे-जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय परिवहन राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह,केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड,रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार, उद्योग मंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांच्यासह खासदार संजय जाधव, हेमंत पाटील, उन्मेश पाटील, डॉ.प्रितम मुंडे, प्रतापराव चिखलीकर, सुधाकर श्रीगांरपुरे व केंद्र आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार सहमत झाला.
केंद्र शासनाच्या भारतमाला योजनेंतर्गत देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित केले जात आहेत. यामध्ये जालन्याचा समावेश करण्यात आला असून, या प्रकल्पाची किंमत ४५० कोटी रुपये आहे. या प्रकल्पामुळे जालना आणि औरंगाबाद यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हे तसेच बुलढाणा भागातील व्यापार उद्योगातील मालाची वाहतूक अतिशय वेगवान आणि अत्यंत कमी खर्चात होईल.
औद्योगिक वसाहतीतील सर्व परिसर जोडण्यासाठी जालना महत्त्वपूर्ण केंद्र निर्माण होत असून, यामुळे स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे.रस्ते, रेल्वे मार्ग, दळणवळण, गोदामे, उद्योगातील कच्चा, पक्का माल साठा करून ठेवण्यासाठी मोठी स्टोअर्स गोदामे, कस्टम क्लिअरन्सची व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार असून, या संदर्भात आजचा हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा