नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कोरोनावर मात करणाऱ्या भारतीय लसीच्या मोठ्या यशानंतर आता जनावरांच्या लंपी आजारावर भारतीय शास्त्रज्ञांनी स्वदेशी लस विकसित केली आहे. ग्रेटर नोएडा येथील जागतिक दुग्ध व्यवसाय शिखर परिषद-२०२२ च्या उदघाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत माहिती दिली.
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, अलीकडच्या काळात भारतातील अनेक राज्यांमध्ये लंपी नावाच्या आजारामुळे पशुधनाचे नुकसान झाले आहे. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारसह विविध राज्य सरकार प्रयत्नशील आहेत. परंतु, आता काळजी करण्याचे कारण नसून भारतीय शास्त्रज्ञांनी या आजारासाठी स्वदेशी लसीची निर्मिती केली आहे. यावेळी देशातील प्राण्यांच्या सार्वत्रिक लसीकरणावरही भर देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही पंतप्रधान म्हणाले. २०२५ पर्यंत १००% प्राण्यांना 'फुट एंड माउथ डिजीज' आणि 'ब्रुसलॉसिस'च्या विरोधातील लस देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी जाहिर केले.
भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्रातील ७०% महिलांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विकास करण्यामागे भारतीय महिलाच खऱ्या अर्थाने कर्णधार आहेत. एवढेच नाही तर भारतातील दुग्ध सहकारी संस्थांच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त महिला असल्याचे यावेळी पंतप्रधान म्हणाले.
आत्मनिर्भर भारतासाठी केंद्र सरकारकडून अनेक पाऊले उचलली जात आहेत.२०१४ पासून केंद्र सरकारने भारताच्या दुग्ध क्षेत्राची क्षमता वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम आज दुग्धोत्पादनापासून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. २०१४ मध्ये भारतात १४६ दशलक्ष टन दुधाचे उत्पादन झाले होते. आता ते २१० दशलक्ष टन झाले असून, यामध्ये सुमारे ४४% वाढ झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
भारत दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वात मोठा डेटाबेस तयार करीत आहे. डेअरी क्षेत्राशी निगडीत प्रत्येक जनावराचे टॅगिंग केला जात आहे.यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने डेअरी क्षेत्राशी संबंधित प्राण्यांची बायोमेट्रिक ओळख केली जात असून, याला पशु आधार असे नाव देण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा