Road Accidents : गतवर्षभरात १.७३ लाख नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू, एनसीआरबीचा अहवाल | पुढारी

Road Accidents : गतवर्षभरात १.७३ लाख नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू, एनसीआरबीचा अहवाल

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात गतवर्षभरात १.७३ लाख नागरिकांनी रस्ते अपघातात प्राण गमावले असल्याची माहिती नॅशनल क्राॅईम रेकाॅर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आली आहे. रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या उत्तर प्रदेशात नोंदवण्यात आली आहे. राज्यात २०२१ मध्ये रस्ते अपघातात २४ हजार ७११ नागरिकांचा मृत्यू झाला. तर,दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या तामिळनाडूत १६ हजार ६८५ जणांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे देशातील रस्ते अपघाताच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे.

गेल्या वर्षभरात ४ लाख २२ हजार ६५९ रस्ते अपघाताची नोंद घेण्यात आली होती. २०२० मध्ये हे प्रमाण ३ लाख ६८ हजार ८२८ एवढे होते. एकूण अपघाताच्या संख्येत रेल्वे अपघातांची संख्या १७ हजार ९९३ तर रेल्वे क्रॉसिंगवरील अपघाताची संख्या १ हजार ५५० एवढी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या अपघातामुळे २०२१ मध्ये १ लाख ७३ हजार ८६० जणांचा मृत्यू झाला आहे. काही राज्यांमधील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. (Road Accidents)

तामिळनाडूत २०२० मध्ये ४६ हजार तर, मध्यप्रदेशात ४३ हजार ३६० रस्ते अपघाताची नोंद घेण्यात आली होती. पंरतु, २०२१ मध्ये या राज्यांमधील अपघतांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली. या राज्यात गतवर्षी अनुक्रमे ५७ हजार ९० आणि ४९ हजार ४९३ अपघात झाले. उत्तर प्रदेश (३०,५९३) , महाराष्ट्र (२४,९०८) आणि केरळमधील (२४,९०८) अपघातांच्या प्रमाणातही वाढ दिसून आली आहे. या राज्यांमध्ये २०२० मध्ये झालेल्या अपघातांच्या तुलनेत २०२१ मध्ये अनुक्रमे ३६,५०९, ३०,०८६ आणि ३३,०५१ अपघात झाले. (Road Accidents)

देशातील रस्ते अपघातात ३ लाख ७३ हजार ८८४ नागरिक जखमी झाले, तर १ लाख ७३ हजार ८६० जणांचा मृत्यू झाला. रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झालेल्या राज्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रात १६ हजार ४४६ नागरिकांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यू पैकी उत्तर प्रदेशमध्ये १४.२%, तामिळनाडूत ९.६% आणि महाराष्ट्रात ९.५% मृत्यूची नोंद घेण्यात आल्याची माहिती अहवालातून देण्यात आली आहे. (Road Accidents)

हेही वाचलंत का?

Back to top button